भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आशिया चषक २०२२ साठी १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल यांसारखे वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघात ३ वेगवान गोलंदाजांना जागा देण्यात आली आहे. अनुभवी भुवनेश्वर कुमार वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल. बुमराह बाहेर झाल्यानंतर भुवनेश्वरबरोबर मोहम्मद शमी वेगवान गोलंदाजी फळीचा भाग असेल अशी आशा होती. परंतु निवडकर्त्यांनी त्याच्यावर दुर्लक्ष करत युवा गोलंदाजांना प्राधान्य दिले. यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंग याने शमीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
आशिया चषकासाठी (Asia Cup 2022) भारतीय संघात वेगवान गोलंदाजी विभागात (Indian Pace Bowling Attack) भुवनेश्वर कुमारबरोबर युवा अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांची निवड करण्यात आली आहे. वरिष्ठ गोलंदाज शमीला डावलत युवा गोलंदाजांना प्राधान्य देण्याच्या निर्णयाबाबत पाँटिंगने (Ricky Ponting) प्रतिक्रिया दिली आहे. भारताकडे टी२० क्रिकेटमध्ये शमीपेक्षा (Mohammad Shami) चांगले गोलंदाज आहेत. परंतु जर संघात ४ वेगवान गोलंदाज असते, तर चौथ्या गोलंदाजाच्या रूपात नक्कीच शमीची निवड झाली असती, असे त्यांचे म्हणणे आहे.
शमीबद्दल बोलताना पाँटिंग म्हणाला की, “तो दीर्घ काळापासून भारतीय संघाचा चांगला गोलंदाज राहिला आहे. जर तुम्ही त्याच्या ताकदीनुसार पाहिले तर, तो कसोटी क्रिकेटमध्ये जास्त यशस्वी ठरतो. परंतु टी२० क्रिकेटमध्ये मला वाटते की, शमीच्या तुलनेत भारतीय संघाकडे भरपूर चांगले वेगवान गोलंदाज आहेत. भारताने आशिया चषकासाठी फक्त ३ वेगवान गोलंदाज निवडले आहेत. त्यामुळे जर संघात कदाचित ४ वेगवान गोलंदाज असते, तर चौथ्या गोलंदाजांच्या रूपात नक्कीच शमीचे नाव असते.”
पुढे टी२० विश्वचषकाबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार म्हणाला की, “मला वाटते, भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४ वेगवान गोलंदाजांसोबत जाईल. सोबतच ते जास्त फिरकीपटूंचा आणण्यासाठीही प्रयत्नशील असतील, मग परिस्थिती त्यांच्या प्रतिकूल असली, तरीही.”
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-