इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रिषभ पंत (Rishbh Pant) दुखापत होऊनही फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्यानंतर पंतचं सर्वत्र कौतुक होत आहे. पहिल्या दिवशी पंतच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती आणि नंतर समजलं की त्या अंगठ्याला फ्रॅक्चर आहे. या दरम्यान, आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक हेमांग बदानी (Hemang Badani) यांनी पंतच्या धैर्याचं भरभरून कौतुक केलं आहे. बदानींचं म्हणणं आहे की, रिषभ पंत भविष्यात भारताचा कर्णधार होऊ शकतो.
सोनी स्पोर्ट्सशी बोलताना दिल्ली कॅपिटल्सचे कोच बदानी यांनी पंतची हिंमत आणि जिद्द यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, पंतने हे ठरवलंय की तो टीम इंडियाचा भविष्यकालीन नेता बनणारच. बदानी म्हणाले की, रिपोर्टनुसार पंतला 6 आठवड्यांचा आराम घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. तरीही त्याने मैदानात उतरून खेळण्याचा निर्णय घेतला.
बदानी पुढे म्हणाले, तुम्हाला त्या पायाने फलंदाजी करावी लागते, धावावं लागतं. तरीही पंत खेळला, जेणेकरून तो टीमला हे दाखवू शकेल की त्याच्यावर विश्वास ठेवता येतो. पंत हा फक्त एक सामान्य खेळाडू नाही, तो संघाचा उपकर्णधार आहे आणि भविष्यात तो कर्णधार सुद्धा नक्की होऊ शकतो. त्याने अनेक वेळा आपल्या फलंदाजीने सामने जिंकून दिले आहेत, पण हा क्षण वेगळा होता. तो त्याच्या नेतृत्वगुणांचा स्पष्ट संकेत देणारा आहे.
पंत पहिल्या दिवशी दुखापतग्रस्त झाला होता. त्यावेळी तो 37 धावांवर होता. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. चालायला देखील त्याला त्रास होत होता, तरीही त्याने हिंमत दाखवत शानदार अर्धशतक ठोकलं. पंत 54 धावा करून बाद झाला.






