भारताला यंदाच्या मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद मिळवून देणाऱ्या कर्णधार रोहित शर्माकडून वनडे संघाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड समितीने शुभमन गिलला नवीन वनडे कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. या निर्णयानंतर क्रिकेटविश्वात मोठी चर्चा सुरू झाली आहे. आता असा दावा केला जात आहे की, रोहितला हटवण्याचं खरं कारण निवड समितीने सांगितलेल्या कारणापेक्षा वेगळं आहे.
बीसीसीआयला टीमचं वातावरण बिघडू नये असं वाटतं होतं, म्हणूनच रोहितला कर्णधारपदावरून हटवलं गेलं, असं सूत्रांनी सांगितलं आहे. 4 ऑक्टोबर रोजी शुभमन गिलला वनडे संघाचं नेतृत्व देण्यात आलं, ज्यामुळे रोहित 2027च्या वनडे विश्वचषकात खेळेल की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे.
मुख्य निवडकर्ता अजीत आगरकर यांनी सांगितलं की, “तीन फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार ठेवणं व्यवहार्यदृष्ट्या शक्य नाही.”
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या अहवालानुसार, निवडकर्ते इच्छित नव्हते की रोहित स्वतःच्या पद्धतीने गोष्टी चालवाव्या. कारण त्यांना भीती होती की त्यामुळे संघाच्या वातावरणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. BCCIच्या सूत्राच्या मते, “रोहितसारखा मोठ्या कर्तृत्वाचा खेळाडू नेतृत्व भूमिकेत असेल, तर त्याची विचारधारा ड्रेसिंग रूममध्ये प्रभावी ठरते. वनडे हा कमी खेळला जाणारा फॉरमॅट असल्याने, तो आपल्या मर्जीनुसार गोष्टी चालवू शकला असता आणि त्यामुळे संघात तणाव निर्माण होण्याची शक्यता होती.”
रिपोर्टमध्ये असंही नमूद केलं आहे की, गौतम गंभीर यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्या पहिल्या सहा महिन्यांत थोडं मागे राहून काम केलं. परंतु न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकांतील पराभवानंतर त्यांनी संघाच्या बाबतीत थेट हस्तक्षेप करायला सुरुवात केली.
आता रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गिलच्या नेतृत्वाखाली खेळणार आहेत. मात्र ते 2027 च्या वर्ल्ड कपपर्यंत टिकतील की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. अहवालानुसार, गंभीर आणि आगरकर दोघेही या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंचा फॉर्म अचानक घसरू नये, याची खबरदारी घेत आहेत. त्यांना वाटतं की, दोघेही आपल्या तिशीच्या शेवटाकडे जात असल्याने दोन वर्षांनंतर त्याच पातळीवर खेळणं कठीण होईल. त्यामुळे भविष्यातील नेतृत्व आणि संघ संतुलन लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे.





