भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा सध्या विश्रांतीवर आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर त्याने विश्रांतीचा निर्णय घेतला होता. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या आशिया चषकातून तो पुनरागमन करेल. आशि चषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून, प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाचा भाग नाही. तर दुसरा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला देखील संघाचे स्थान मिळाले नाही. नुकतेच एका मुलाखतीत रोहितला याबाबत प्रश्न विचारले असता त्याने महत्त्वाचे वक्तव्य केले.
एका कार्यक्रमात बोलताना रोहितने अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. शमीबाबत बोलताना तो म्हणाला, “ बुमराह, शमी आणि हे सर्व अनुभवी खेळाडू भारतीय संघासोबत कायमचे नसतील. त्यामुळे तुम्हाला इतर खेळाडूंना तयार करावे लागेल. मी आणि राहुल भाई हेच करतो. आम्ही याबद्दल बोललो आहे. आम्ही आमची बेंच स्ट्रेंथ तयार करतोय. मोठ्या प्रमाणात होणारे क्रिकेट, दुखापती आणि भविष्यातील योजना यासाठी ही बेंच स्ट्रेंथ महत्त्वाची असेल.
रोहित पुढे म्हणाला, “आम्हाला कधीही एक किंवा दोन खेळाडूंवर अवलंबून असणारा संघ बनायचे नाही. आम्हाला असा संघ बनवायचा आहे, जिथे प्रत्येकजण संघासाठी योगदान देऊ शकेल. त्यामुळेच आम्ही तरुणांना जास्तीत जास्त संधी देऊ इच्छितो. या कामी संघातील अनुभवी खेळाडूंची ही मदत होते.”
भारत विक्रमी आठव्यांदा आशिया चषक आपल्या नावे करण्यासाठी मैदानात उतरेल. यंदा ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळली जाईल. भारत आपल्या अभियानाची सुरुवात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध २८ ऑगस्ट रोजी करेल. भारत या स्पर्धेतून गतविजेता म्हणून सहभागी होणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकापूर्वी भारत आशिया चषक जिंकून आपला आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटचा ‘राजा बाबू’! एका पायावर मारले तब्बल ७० षटकार; आता सरकारकडून आहे अपेक्षा
‘संजू बाबा’चा विषये का! एकदा चेंडू हातून निसटूनही पूर्ण केला झेल, पाहा कौतुकास्पद कॅच
थेट हृदयावर वार! राष्ट्रगीतापूर्वी कर्णधार राहुलने असे काही करत ठेवला देशभक्तीचा आदर्श






