भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना पार पडला. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडलेला हा सामना अनिर्णीत राहिला. भारतीय संघाला हा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी होती. परंतु, न्यूझीलंडच्या शेवटच्या जोडीने हे स्वप्न मोडले आणि सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न याने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्नने ट्वीट करत लिहिले की, “मला खर तर खूप आश्चर्य वाटत आहे. नवीन चेंडू उपलब्ध असताना देखील भारतीय संघाने त्याचा वापर केला नाही. हे विचित्र आहे, षटके कमी होत असताना प्रकाशही कमी होत होता.”
https://twitter.com/ShaneWarne/status/1465270078883041293
भारतीय संघाला हा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी होती. भारतीय संघाने शेवटच्या सत्रात चांगली गोलंदाजी केली. परंतु, कमी प्रकाशामुळे पंचांनी हा सामना लवकर संपवण्याचा निर्णय घेतला. ज्याचा फायदा न्यूझीलंड संघाला झाला.
तसेच हातातला सामना निसटल्यानंतर इरफान पठाणने देखील अजिंक्य रहाणेवर जोरदार टीका केली आहे. इरफान पठाणने म्हटले की, “जर विराट कोहली कानपूर कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व करत असता, तर असे झालेच नसते. चौथ्या दिवशी (२८ नोव्हेंबर) भारताने आक्रमक खेळ केला नाही आणि डाव घोषित करण्यास बराच वेळ लागला. त्यामुळेच न्यूझीलंड संघाला हा सामना वाचवण्यात यश आले.”
पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेच्या हाती देण्यात आले होते, तर मुंबईत ३ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली पुनरागमन करणार आहे. या दुसऱ्या सामन्यात काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. कारण पदार्पण करत असलेल्या श्रेयस अय्यरने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले. तर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या सामन्यात देखील फ्लॉप ठरले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी ‘या’ ३ खेळाडूंनी भारतीय संघात ठोकलीय दावेदारी, एकाने केलीत ९ शतके
शेवटच्या आर्ध्या तासात पंचांनी सतत सूर्यप्रकाशाचा आढावा घेणे योग्य होते का? रहाणेने दिले ‘हे’ उत्तर






