येत्या १८ जून ते २२ जूनदरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. साउथॅम्प्टनच्या मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमने सामने असणार आहेत. या सामन्यासाठी बीसीसीआयने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच हार्दिक पंड्या गोलंदाजी करू शकत नसल्याने त्याला वगळण्यात आले आहे. अशातच शार्दुल ठाकूरच्या प्रशिक्षकांनी शार्दुल ठाकूरला संघात खेळवण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
हार्दिक पंड्या दुखापतीतून बाहेर आल्यानंतरही गोलंदाजी करू शकत नाहीये. त्यामुळे त्याला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी आणि इंग्लंड दौऱ्यासाठी दुर्लक्षित केले गेले आहे. अशातच शार्दुल ठाकूरचे प्रशिक्षक दिनेश यांना वाटते की, हार्दिक पंड्याऐवजी शार्दुल ठाकूरला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळावे.
स्पोर्ट्सकिडाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की, “प्रशिक्षक म्हणून माझी इच्छा आहे की, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शार्दुल ठाकूरला प्राधान्य देण्यात यावे. त्याचे कारण त्याची अलीकडील कामगिरी आहे. तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोघांमध्ये योगदान देऊ शकतो. भारतासाठी प्लस पॉइंट म्हणजे अष्टपैलूची तूट भरून काढली जाईल. पण तरीही सर्व काही संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षकांवर अवलंबून असेल.”
पुढे ते म्हणाले की, “भारताकडे सध्या अष्टपैलू खेळाडू नसल्यामुळे शार्दूलला बर्याच काळासाठी पसंती दिली जाईल. हार्दिक पांड्या अष्टपैलू म्हणून खेळत होता; पण आता दुखापतीमुळे तो गोलंदाजी करू शकत नाही. संघाला वेगवान गोलंदाजी अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता आहे आणि फक्त शार्दुल ठाकूर या रांगेत आहेत. पण चांगल्या कामगिरीसाठी त्याला बराच वेळ सामने खेळण्याची गरज आहे.”
तसेच पुढे ते म्हणाले, “विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी खेळाडूंना १० ते १२ दिवसांचा अवधी मिळणार आहे. त्यामुळे त्यांना सराव आणि तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. शार्दुल नुकताच इंग्लंडविरुद्ध खेळला आहे. म्हणून मला वाटत नाही की त्याला काही समस्या असेल. तो दबाव सहन करण्याची कला शिकला आहे. त्याने संघाला ब्रिस्बेन कसोटीत विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. रोहित शर्माप्रमाणेच शार्दुल ठाकूरही नैसर्गिकरित्या आक्रमक खेळाडू आहे. परंतु त्याने स्वत:वर काम केले आहे आणि आता मैदानी शॉट्स खेळायला सुरुवात केली आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
वडिलांच्या एका चुकीमुळे पृथ्वी शॉला झाला होता ८ महिन्यांचा वनवास, स्वत:च दिली धक्कादायक माहिती






