सध्या भारतीय संघाच्या बाहेर असलेला युवा सलामीवीर पृथ्वी शॉ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या साखळी सामन्यात त्याने दमदार कामगिरी केली होती. या कामगिरीचे बक्षीस त्याला मुंबई क्रिकेट संघटनेकडून देण्यात आले. विजय हजारे ट्रॉफीच्या बाद फेरीच्या सामन्यांसाठी त्याच्याकडे मुंबई संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. ८ मार्चपासून बाद फेरीचे सामने खेळविले जातील.
वरिष्ठ खेळाडू झाले राष्ट्रीय संघात सामील
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान १२ मार्चपासून पाच सामन्यांची टी२० मालिका अहमदाबाद येथे खेळवली जाणार आहे. मुंबई संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर, अष्टपैलू शार्दुल ठाकूर व अनुभवी सूर्यकुमार यादव यांचा या मालिकेसाठी घोषित झालेल्या भारतीय संघात समावेश करण्यात आला असून, ते लवकरच भारतीय संघाच्या बायो-बबलमध्ये प्रवेश करतील. अशा परिस्थितीत मुंबई संघाची धुरा सध्या भारतीय संघातून वगळण्यात आलेल्या पृथ्वी शॉच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.
चांगल्या फॉर्ममध्ये आहे पृथ्वी
विजय हजारे ट्रॉफीच्या ड गटातील साखळी सामन्यांमध्ये पृथ्वीने चमकदार कामगिरी केली आहे. संघाला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून देण्यात त्याने सिंहाचा वाटा उचलला. त्याने पाच सामन्यात संघासाठी सलामीवीर म्हणून येत एक द्विशतक व एका शतकाच्या सहाय्याने ४०४ धावा फटकावल्या आहेत. पाँडेचेरीविरूद्ध त्याने नाबाद २२७ धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेत खराब कामगिरी झाल्यामुळे तो सध्या भारतीय संघाच्या बाहेर आहे.
विजय हजारे ट्रॉफीच्या बाद फेरीसाठी मुंबईचा संघ-
पृथ्वी शॉ (कर्णधार), धवल कुलकर्णी, सिद्धेश लाड, शिवम दुबे, सरफराज खान, आदित्य तरे, शम्स मुलानी, तनुष कोटीयान, हार्दिक तामोरे, प्रशांत सोळंकी, मोहित अवस्थी, अथर्व अंकोलेकर, तुषार देशपांडे, अमान खान, सुजित नाईक, आकाश पारकर, चिन्मय सुतार व सिद्धार्थ राऊत.
महत्त्वाच्या बातम्या –
“…तर कुंबळेने १००० कसोटी बळी घेतले असते”, ‘या’ दिग्गजाने सांगितले कारण
युनिव्हर्स बॉस म्हणतोय,”मी जगातील सर्वोत्तम फलंदाज”; दिले ‘हे’ कारण
भारत पुन्हा बुमराहविना उतरणार मैदानावर? ‘या’ मालिकेतून घेऊ शकतो माघार





