इंडियन प्रीमियर लीगमधील फ्रेंचाइजी दिल्ली कॅपिटल्स संघाचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरने आयपीएलच्या उर्वरित १४ व्या हंगामात पुनरागमन करण्याची तयारी सुरू केली आहे. क्रिकेट मैदानावरील पुनरागमनासाठी श्रेयस तंदुरुस्तवर मेहनत घेताना दिसून आला आहे. त्याचबरोबर त्याने प्रशिक्षण देखील सुरू केले आहे.
श्रेयसने पाच दिवसांपूर्वी मुंबईतील इनडोअर बीकेसी सुविधेत संघाचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे यांच्याबरोबर प्रशिक्षण सुरू केले होते. या महिन्याच्या सुरुवातीला श्रेयसने खांद्याच्या दुखापतीतून सावरत असल्याने रॉयल लंडन वन-डे चषक स्पर्धेतून माघार घेतली होती. तो या स्पर्धेत लँकशायर संघाकडून खेळणार होता.
मागच्या वर्षी जेव्हा पृथ्वी शॉची ऑस्ट्रेलिया विरुद्ध खराब कामगिरी झाली, तेव्हा प्रशिक्षक आमरे यांनीच त्याला प्रशिक्षण दिले होते. त्याचबरोबर आता दिल्ली फ्रेंचाइजीकडून श्रेयससाठी त्यांना प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले गेले आहे. ते ३१ जुलैपर्यंत श्रेयसला प्रशिक्षण देणार आहेत. यानंतर श्रेयसला बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) दाखल व्हावे लागणार आहे.
फ्रेंचाइजीच्या एका सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार तो सध्या इनडोअर सराव करत आहे. कारण त्याला बाहेर मैदानावर सराव करायची परवानगी दिलेली नाही. त्याचबरोबर मुंबईमध्ये सध्या पावसाचे वातावरण देखील आहे. एनसीए अधिकाऱ्यांकडून श्रेयसच्या तंदुरुस्तीकडे लक्ष दिले जात आहे. पण मागील पाच दिवसांत झालेल्या प्रगतीनंतर अय्यर आयपीएल पुन्हा सुरू होईपर्यंत तंदुरुस्त व्हायला पाहिजे.
महत्वाचे म्हणजे आयपीएल २०२१ चे उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक देखील जाहीर झाले आहे. हे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये पुन्हा सुरू होणार असून, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघात दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना होणार आहे. तर आयपीएल २०२१ पुन्हा सुरु झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा सर्वात पहिल्यांदा २२ सप्टेंबरला सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध सामना खेळेल.
हा हंगाम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २९ सामन्यांनंतर कोरोनामुळे स्थगित करण्यात आला होता. त्यावेळी २९ सामन्यांच्या पहिल्या टप्प्यात श्रेयस खेळला नव्हता. त्याला हा हंगाम सुरु होण्यापूर्वी मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध सामना खेळताना खांद्याची दुखापत झाली होती. त्याला या दुखापतीमुळे खांद्यावर शस्त्रक्रियादेखील करुन घ्यावी लागली. त्याचमुळे तो गेले ४ महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे.
आयपीएल २०२१ ला स्थगिती मिळण्यापूर्वी या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने एकूण ८ सामने खेळले आहेत. त्यापैकी ६ सामने जिंकले आहेत, तर २ सामने हारले आहेत. याच सामन्यांच्या आधारे गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स अव्वल स्थानावर आहे. या हंगामात श्रेयसच्या अनुपस्थितीत रिषभ पंतने संघाचे नेतृत्व केले होते. आता हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल की आयपीएल २०२१ ला सुरुवात झाल्यानंतर जर श्रेयसने पुनरागमन केले तर, संघाचे नेतृत्व कोण सांभाळणार.
महत्त्वाच्या बातम्या –
मैदानात घुसला चाहता, त्यानंतर बेन स्टोक्सनेही केली ती चूक; सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली