आयपीएल 2026 (IPL 2026) मध्ये, धरमशालाच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध खेळताना पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) एक खास शतक (100 सामने) पूर्ण केले. श्रेयस अय्यरने आपल्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत एकदाच विजेतेपद मिळवले आहे, जे त्याने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडून खेळताना जिंकले होते. आता तो आयपीएल इतिहासामध्ये 100 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणारा पाचवा कर्णधार ठरला आहे.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद सांभाळण्याचा विक्रम एमएस धोनी याच्या नावावर आहे, ज्याने 235 सामन्यांमध्ये ही जबाबदारी सांभाळली. आता आयपीएलमध्ये 100 किंवा त्याहून अधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा, विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यानंतर श्रेयस अय्यरचे नावही जोडले गेले आहे.
पंजाब किंग्सचे कर्णधारपद स्वीकारण्यापूर्वी अय्यरने दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचेही नेतृत्व केले आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली 2024 च्या आयपीएल हंगामात केकेआरने विजेतेपद पटकावले होते. आरसीबी विरुद्धच्या सामन्यापूर्वी, श्रेयस अय्यरने 99 सामन्यांत कर्णधारपद भूषवताना 54 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर 40 सामन्यांत त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सर्वाधिक सामन्यांत कर्णधारपद भूषवणाऱ्यांची यादी
एमएस धोनी: 235 सामने (चेन्नई सुपर किंग्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स)
रोहित शर्मा: 158 सामने (मुंबई इंडियन्स)
विराट कोहली: 143 सामने (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
गौतम गंभीर: 129 सामने (दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स)
श्रेयस अय्यर: 100 सामने (दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स)
टी-20 क्रिकेटमध्ये कोणत्याही कर्णधाराचा पहिला उद्देश संघाला विजय मिळवून देणे हा असतो, तर सध्याच्या काळात विरोधी संघाला कमीत कमी धावांवर रोखणे हे मोठे आव्हान असते. मात्र, पुरुष टी-20 क्रिकेटच्या इतिहासात ज्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली संघाने सर्वाधिक वेळा 200 किंवा त्याहून अधिक धावांचा स्कोअर केला आहे, त्या यादीत श्रेयस अय्यर अव्वल स्थानावर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत तब्बल 31 वेळा 200 हून अधिक धावा केल्या आहेत.




