टी२० क्रिकेटला सुमारे २३ वर्षांचा इतिहास आहे. आयपीएल २०२६ मध्ये शनिवारी (१६ मे) ईडन गार्डन्सवर जे घडले, त्यामुळे या प्रकारमध्ये एक इतिहास रचला गेला. पहिला अधिकृत टी२० सामना १३ जून २००३ मध्ये खेळला गेला. त्या दिवसापासून पुढील ८३७२ दिवसांपर्यंत एकाच टी२० सामन्यात पाच फलंदाजांनी ५० पेक्षा अधिक धावा केल्याच्या २० घटना घडल्या, मात्र एकाच सामन्यात सहा फलंदाजांनी अशी ऐतिहासिक कामगिरी आयपीएलच्या ६० व्या सामन्यात घडली.
आयपीएलच्या या १९ व्या हंगामात शनिवारी (१६ मे) कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स भिडले. या सामन्यात एक नाही, दोन नाही तर तब्बल सहा फलंदाजांनी ५० पेक्षा अधिक धावा केल्या, जे टी२० क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले. हे सहाही फलंदाज चार वेगवेगळ्या देशाचे आहेत, त्यापैकी तीन भारतीय, प्रत्येकी एक ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंडचा आहे.
या सामन्यात केकेआरकडून भारतीय फलंदाज अंगकृष रघुवंशीने ४४ चेंडूंत नाबाद ८२ धावा, ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरॉन ग्रीनने नाबाद ५२ (२८) आणि न्यूझीलंडच्या फिन ऍलनने ९३ धावा (३५) केल्या. एकाच आयपीएल सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारी केकेआरची दुसरी त्रिकूल असून त्यांच्याआधी २०१९ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध शुबमन गिल, क्रिस लिन आणि आंद्रे रसेल यांनी ५० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.
या सामन्यात पाहिले तर जीटीकडून सलामावीर साई सुदर्शन आणि कर्णधार गिल यांनी ५० पेक्षा अधिक धावा केल्या. सुदर्शनने नाबाद ५३ धावा (२८), गिलने ८५ धावा (४९) आणि इंग्लंडचा विकेटकीपर-फलंदाज जोस बटलर जो सध्या जीटीकडून खेळत असून त्याने ५७ धावा (३५) केल्या. तसेच एकाच आयपीएल सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारी जीटीची ही दुसरी त्रिकूट आहे. याआधी गिल, बटलर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अशी कामगिरी केली होती.
सामन्याचे पाहिले तर जीटीने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. केकेआरने ३ अर्धशतकांच्या सहाय्याने २० षटकांत २ विकेट्स गमावत २४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात जीटीने २० षटकांत ४ विकेट्स गमावत २१८ धावा केल्या. हा सामना जिंकल्याने केकेआरच्या प्लेऑफच्या आशा जिवंत आहेत. तसेच जीटी गुणतालिकेत १६ गुणासंह दुसऱ्या आणि केकेआर ११ गुणांसह सातव्या स्थानी आहेत.






