गुरुवारी(11 एप्रिल) आयपीएल 2019 मधील 25 वा सामना सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध चन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. या सामन्यात चेन्नईने 4 विकेट्सने विजय मिळवला.
मात्र नेहमी शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने या सामन्यातील शेवटच्या षटकात मैदानावर येत पंचाबरोबर नो बॉल प्रकरणी घातलेला वाद पाहुन अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याला या प्रकरणी 50 टक्के मॅच फीचा दंड करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे अनेकांनी धोनीवर टिका केली आहे. पण भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने धोनीला पाठिंबा देत सर्वजण माणूस आहेत असे म्हटले आहे.
गांगुलीला जेव्हा ज्या प्ररणाबाबत विचारले तेव्हा तो म्हणाला, ‘सर्व माणूस आहेत. धोनीने जे केले त्यामुळे त्याच्यातील प्रतिस्पर्धीची क्षमता दिसते. जे असाधारण आहे.’
याबरोबर दिल्ली कॅपिटल्सचा सल्लागार असणारा गांगुली दिल्लीने शुक्रवारी कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर म्हणाला ‘मागील दोन सामने चांगल्या संघांविरुद्ध जिंकणे ही चांगले आहे. मी खूप समाधानी आहे.’
धोनी आणि पंचांमधील वाद – नक्की झाले काय?
राजस्थानने चेन्नईसमोर 152 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना धोनी 20 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर 58 धावांवर असताना बाद झाला. त्याला बेन स्टोक्सने बाद केले.
यावेळी धोनी बाद झाल्यानंतर पुढच्या चेंडूवर मैदानावरील पंच उल्हास गंधे यांनी नो बॉलचा इशारा केला, पण लगेचच स्वेअर लेगवरील पंच ब्रुस ऑक्सनफॉर्डशी चर्चा करुन हा नो बॉलचा निर्णय बदलला. त्यामुळे मैदानात असलेला रविंद्र जडेजा पंचाशी वाद घालू लागला. काही वेळात धोनीही मैदानात आला, त्याने पंचाशी चर्चा करत वाद घातल्याचे दिसले.
मात्र पंचांनी निर्णय बदलला नाही. त्यामुळे चेन्नईला नो बॉल मिळाला नाही. अखेर शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना मिशेल सँटेनरने षटकार ठोकत चेन्नईला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
–चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध बेन स्टोक्सने घेतला अफलातून झेल, पहा व्हिडिओ
–राजस्थान विरुद्धच्या सामन्यात धोनीकडून रविंद्र जडेजाला बसला मार, पहा व्हिडिओ