भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका मंगळवारी (20 सप्टेंबर) सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये खेळला गेला, जो 4 विकेट्स राखून ऑस्ट्रेलियाने जिंकला. या सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला असला, तरी त्यांच्या फलंदाजांचे प्रदर्शन कौतुकास पात्र होते. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांनी या सामन्यात केलेल्या प्रदर्शनाचा फायदा त्यांना मिळाला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला मात्र नुकसान सहन करावे लागले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना मंगळवारी मोहालीमध्ये खेळला गेला. तर दुसरीकडे पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिका देखील मंगळवारीच सुरू झाली. या दोन्ही मालिकांमधील पहिला सामना खेळला गेल्यानंतर आयसीसी टी-20 क्रमवारीत महत्वाचे फेरबदल पाहायला मिळाले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) टी-20 फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने आता यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. सूर्यकुमारकडे एकूण 780 रेटिंग पॉइंट्स आहेत. तर बाबरकडे 771 रेटिंग पॉइंट्स आहेत.
सूर्यकुमारने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 25 चेंडूत 46 धावांची खेळी केली. तर दुसरीकडे बाबरने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 24 चेंडूत 31 धावा करून विकेट गमावली. त्याचा स्ट्राईक रेट पुन्हा एकदा 130 पेक्षा कमी होता. त्याने सुरुवात चांगली केली, पण मोठी खेळी मात्र करू शकला नाही. पाकिस्तानने या सामन्यात 158 धावांचे आव्हान उभे केले होते, पण इंग्लंडने हा सामना 6 विकेट्सच्या अंतराने नावावर केला.
भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) त्याच्या जुन्या रंगात परतल्यापासून संघासाठी सतत महत्वाची भूमिका पार पाडताना दिसत आहे. या टी-20 सामन्यात त्याने संघाला विजय मिळवून दिला नसला, तरी मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी मात्र सर्वात महत्वाचा वाटा त्याचाच होता. हार्दिकने अवघ्या 30 चेंडूत 71 धावा कुटल्या आणि संघाला 208 धावांपर्यंत पोहोचवले. या जबरदस्त खेळीनंतर आयसीसी टी-20 अष्टपैलूंच्या क्रमवारीत तो पाचव्या क्रमांकावर (180 रेटिंग पॉइंट्स) आला आहे. त्याने ग्लेने मॅक्सवेल आणि जेजे स्मिथ यांना मागे टाकत हा क्रमांक पटकावला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पुन्हा बदलले गेले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे ठिकाण! लॉर्ड्स नव्हेतर या मैदानावर होणार सामना
तीन सामन्यांतील 18 चेंडूत भुवनेश्वरने खर्च केल्यात 49 धावा, माजी दिग्गजाने खूपच सुनावले
तुफान व्हायरल होतेय रोहितची ही’ रिऍक्शन; मात्र नक्की काय घडलेले त्यावेळी?