इंग्लंडने गुरुवारी (10 नोव्हेंबर) एडिलेड ओव्हल मैदानात टी-20 विश्वचषक 2022 चा उपांत्य सामना जिंकला. या सामन्यात त्यांच्यासमोर भारतीय संघाचे आव्हान होते. भारताविरुद्ध खेळताना इंग्लंडच्या एकाही फलंदाजाने विकेट गमावली नाही आणि विजय मिळवला. आता इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी (13 नोव्हेंबर) विश्वचषकाचा अंंतिम सामना खेळला जाणार आहे. अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या आनंदात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने खास प्रतिक्रिया दिली आहे.
भारताविरुद्ध उपांत्य सामन्यात जोस बटलर (Jos Buttler) आणि ऍलेक्स हेल्स (Alex Hales) त्यांच्या संघाचा डाव सुरू करण्यासाठी खेळपट्टीवर आहे. या दोघांनी अनुक्रमे 80 आणि 86 धावांची नाबाद खेळी केली आणि 169 धावांचे लक्ष्य चार षटके राखून गाठले. भारतीय संघाचे गोलंदाजी आक्रमण या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंड आता अंतिम सामन्यात पोहोचला असला, तरी ग्रुप स्टेजमध्ये त्यांचेही प्रदर्शन निराशाजन राहिले आहे. आयर्लंडसारख्या दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघाने ग्रुप स्टेजमध्ये इंग्लंडला पराभूत केले होते. अशात इंग्लंड संघाने टी-20 विश्वचषकात केलेले पुनरागमन कौतुकास्पद आहे. जोस बटलरला देखील असेच वाटते.
विजयानंतर बटलर म्हणाला, “आयर्लंडकडून मिळालेल्या पराभवानंतर आम्ही ज्या पद्धतीने खेळलो आहे, ते अप्रतिम म्हणावे लागेल. आम्ही इथे (उपांत्य सामन्यात) पोहोच्यानंतर खूप उत्साहित होतो. आज (10 नोव्हेंबर) पहिल्या क्रमांकापासून 11व्या क्रमांकापर्यंतच्या खेळाडूने चांगले प्रदर्शन केले. आम्हाला नेहमी अशीच वेगवान आणि आक्रमक सुरुवात करायची आहे. हेल्सने मैदानाच चांगला उपयोग करून घेतला आणि स्वतःचा फॉर्म दाखवून दिला. या सामन्यात आमचे प्रदर्शन अप्रतिम राहिले.”
हेल्सने 47 चेंडूत 86 धावा केल्या, ज्यासाठी त्याला सामनावीर निवडले गेले. हेल्सने या खेळीला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी, असा करार दिला. हेल्स म्हणाला की, “हे माझ्या चांगला प्रदर्शनांमध्ये नक्कीच सर्वात वरती असेल. भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यात खेळणे आणि असे असे प्रदर्शन करणे म्हणजे माझ्यासाठी मोठा क्षण आहे.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जोडी जबरदस्त! टीम इंडियाला चोपत बटलर-हेल्सने वर्ल्ड रेकॉर्डही केलाय
गोलंदाजांमुळे भारत पराभूत झाला? वाचा पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा काय म्हणाला