रविवारी (9 जून) टी20 विश्वचषकातील सर्वात मोठा सामना खेळला जाणार आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील. या सामन्यापूर्वी आम्ही दोन्ही संघाची तुलना करून कोणता संघ वरचढ आहे, हे तुम्हाला सांगणार आहोत.
रोहित शर्मा भारताचा कर्णधार आहे तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षांपासून भारतीय संघ सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. भारतानं 2023 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. कर्णधार म्हणून रोहितची कामगिरी उत्कृष्ट आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची रणनीती पूर्णपणे फ्लॉप ठरली आहे. बाबर आझम अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात कर्णधार म्हणून फ्लॉप ठरला होता.
सलामीवीर
भारताचे सलामीवीर विराट कोहली आणि रोहित शर्मा आहेत. सलामीवीर म्हणून दोन्ही फलंदाज काय चमत्कार करू शकतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. दुसरीकडे, मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम पाकिस्तानसाठी सलामी देतात. हे दोन्ही फलंदाज टी20 मध्ये चांगल्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करू शकत नाहीत. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये संघाचं नुकसान होतं. ओपनिंगमध्ये भारतीय फलंदाज पाकिस्तानच्या सलामीवीरांपेक्षा नक्कीच पुढे आहेत.
मधली फळी
भारताकडे मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्यासारखे फलंदाज आहेत, जे कोणत्याही क्षणी सामना बदलू शकतात. दुसरीकडे पाकिस्तानकडे फखर जमान, आझम खान, सॅम अयुब आणि शादाब खानसारखे फलंदाज आहेत. यापैकी फखर जमान हा एकमेव फलंदाज आहे, जो वेगानं धावा करू शकतो. पण याखेरीज पाकिस्तानकडे एकहाती विजय मिळवून देणारा एकही फलंदाज नाही. सॅम अयुब याची फलंदाजी चांगली असली तरी संघ व्यवस्थापन त्याला संधी देत नाही. याचाच अर्थ मधल्या फळीतही भारतीय फलंदाज पाकिस्तानी फलंदाजांच्या पुढे आहेत.
अष्टपैलू
भारतीय संघात हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि शिवम दुबेसारखे जागतिक दर्जाचे अष्टपैलू खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे फलंदाजीसह गोलंदाजीतही चमक दाखवण्याची क्षमता आहे. पण जर आपण पाकिस्तानबद्दल बोललो तर त्यांच्याकडे इफ्तिखार अहमद, इमाद वसीम आणि शादाब खान हे अष्टपैलू खेळाडू आहेत. मात्र या अष्टपैलू खेळाडूंना आपल्या कामगिरीत सातत्य राखता आलेलं नाही. यापैकी फक्त शादाब खान हा प्रत्येक सामन्यात योगदान देतो. अशा परिस्थितीत येथेही भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा मजबूत आहे.
गोलंदाजी
वेगवान गोलंदाजीत भारताकडे जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराजसारखे गोलंदाज आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानकडे शाहीन आफ्रिदी, मोहम्मद अमीर, नसीम शाह आणि हरिस रौफसारखे गोलंदाज आहेत. गोलंदाजीत पाकिस्तानचा भारतावर वरचष्मा असला तरी अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची कामगिरी अत्यंत खराब राहिली होती. अशा स्थितीत पाकिस्तानी गोलंदाजांचं मनोबल घसरलेलं असेल. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर होणार आहे, जिथे खेळपट्टी गोलंदाजांना खूप मदत करते अशा परिस्थितीत न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर पाकिस्तानी गोलंदाजांना फायदा मिळू शकतो. याशिवाय भारताकडे जडेजा, कुलदीप आणि चहलसारखे फिरकी गोलंदाज आहेत, जे पाकिस्तानी फिरकीपटूंपेक्षा खूपच सरस आहेत. फिरकी गोलंदाजीत भारताचा वरचष्मा आहे पण वेगवान गोलंदाजीत पाकिस्तान वरचढ आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विश्वचषकात अफगाणिस्तानची धमाल! एका वर्षात 4 मोठ्या संघांना पाजलंय पाणी
श्रीलंकेचा पराभव होऊनही वानिंदू हसरंगानं रचला इतिहास, लसिथ मलिंगाचा मोठा विक्रम मोडला
श्रेयस अय्यरचा गौप्यस्फोट! टी20 विश्वचषकात स्थान न मिळल्यानंतर व्यक्त केली खंत, बीसीसीआयवर टीका