आयपीएल २०२१ दरम्यान चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाजी प्रशिक्षक माईक हसीला कोरोनाची लागण झाली होती. आता तो त्याच्या मायदेशी ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. मात्र, यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्या टी२० विश्वचषकाविषयी त्याने मोठे विधान केले.
विश्वचषक भारतात खेळणे अवघड
माईक हसीने फॉक्स क्रिकेटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मला वाटते की टी२० विश्वचषक भारतात खेळणे खूप कठीण जाईल. आपण आयपीएलमध्ये काय घडले हे पाहिले. विश्वचषकात आणखी संघ असतील. अशा परिस्थितीत आयोजन स्थळांची संख्या अधिक असेल. जर स्थळांची संख्या वाढली तर धोका देखील वाढेल.”
बीसीसीआयने कोरोनादरम्यान केवळ ६ ठिकाणांवर आयपीएल घेण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर, बायो बबलमध्ये असूनही खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला. विश्वचषकासाठी बीसीसीआयने ९ स्थाने निवडली आहेत.
इतर ठिकाणी खेळवावी लागेल स्पर्धा
हसी आपले म्हणणे पुढे नेताना म्हणाला, “आपल्याला या मोठ्या स्पर्धेसाठी युएई किंवा इतर कोणते तरी ठिकाण पहावे लागेल. मला वाटते की, जगातील अनेक क्रिकेट बोर्ड भारतात परत येण्यास घाबरतील.” बीसीसीआय २९ मे रोजी टी२० विश्वचषकासंदर्भात विशेष बैठक घेणार आहे. तसेच, याच प्रकरणात आयसीसीची १ जून रोजी बैठक होणार आहे. मात्र, टी२० विश्वचषकासाठी अजून बराच वेळ बाकी आहे.
आयपीएल २०२१ दरम्यान माईक हसीने बायो बबलमध्ये असण्याचा अनुभव शेअर केला. तो म्हणाला की, “मुंबईहून दिल्लीला जाताना सर्व लोकांना कोरोनाचा धोका होता. जेव्हा स्पर्धा मुंबईहून दिल्लीला पोहचली तेव्हा मी आजारी पडण्यास लागलो. सुरुवातीला माझी चाचणी नकारात्मक आली. मात्र, जेव्हा आमचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी पॉझिटिव्ह आला तेव्हा मला समजले की काहीतरी चुकीचे घडत आहे.” हसी आयपीएलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर १४ दिवस भारतात राहून ऑस्ट्रेलियाला परतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आधी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत अडवला चेंडू, नंतर स्वत:च फेकला सीमारेषेबाहेर! पाहा विनोदी व्हिडिओ
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकत हे भारतीय खेळाडू ठरले आहेत सिक्सर किंग
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती जाहीर करुनही पुनरागमन करणारे ८ खेळाडू, ३ आहेत पाकिस्तानी