भारतीय संघ (Indian cricket team) सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारतीय संघासोबतच अनेक इतर खेळाडूही सध्या इंग्लंडमध्ये आहेत आणि तिथे ते काउंटी क्रिकेट खेळताना दिसत आहेत. चौथ्या कसोटीनंतर अशी बातमी समोर आली आहे की, भारतीय संघाचा एक वेगवान गोलंदाज अचानक इंग्लंडहून भारतात परतत आहे. या खेळाडूने दोन फर्स्ट क्लास सामने खेळले होते आणि त्यात उत्तम गोलंदाजी केली होती. त्यामुळे त्याने मालिकेच्या दरम्यानच टीमचा निरोप घेतल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. आता टीमने यामागचं खरं कारण जाहीर केलं आहे.
खलील अहमद (Khaleel Ahmed) भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज, याने इंग्लंडमधील एसेक्स क्रिकेट टीमसोबत 6 फर्स्ट क्लास आणि 10 लिस्ट ए सामन्यांसाठी करार केला होता. मात्र, त्याने फक्त 2 सामने खेळले आणि त्यामध्ये 4 बळी घेतले. त्यानंतर खलीलने खासगी कारणांमुळे टीममधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे.
एसेक्स क्रिकेट क्लबने यावर अधिकृत निवेदन जारी करत म्हटलं, खलील अहमद खासगी कारणामुळे स्वदेशात परतत असून त्यामुळे क्लबसोबतचा त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येतो.
खलीलने अशा प्रकारे मधेच टीम सोडल्यानंतर एसेक्स संघाने प्रतिक्रिया दिली, जरी त्याच्या जाण्याचं आम्हाला वाईट वाटत असलं, तरी आम्ही त्याच्या निर्णयाचा पूर्ण सन्मान करतो. आमच्यासोबत असताना त्याने दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत. एसेक्स क्रिकेटमधील सर्वजण त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतात.एसेक्ससाठी खेळण्यापूर्वी खलीलने इंडिया ए संघासाठीही एक सामना खेळला होता, ज्यामध्ये त्याने 4 विकेट्स घेतल्या होत्या. तरीदेखील त्याला भारतीय टेस्ट संघात स्थान मिळालं नव्हतं. त्यामुळेच त्याने काउंटी चॅम्पियनशिप खेळण्याचा मोठा निर्णय घेतला होता.






