भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार सुरू आहे. या कसोटी मालिकेबरोबरच येत्या टी२० विश्वचषकाच्याही चर्चा सुरू आहेत. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये विश्वचषकातील सामने खेळले जाणार आहेत. तत्पूर्वी बऱ्याचशा बोर्डांनी आपले संघही घोषित केले आहेत. याच रांगेत आता भारतीय संघाचेही नाव जोडले जाणार आहे.
टी२० विश्वचषकासाठी भारताच्या निवड समितीने १५ सदस्यीय संघ निवडला असून येत्या २४ तासांमध्ये संघ जाहीर केला जाऊ शकतो. इनसाइड स्पोर्ट्सने यासंबंधी वृत्त दिले आहे.
इनसाइड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकारी आणि निवड समितीचा भाग असलेल्या सदस्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. चेतन शर्मांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने फार पूर्वीच १५ सदस्यीय भारतीय संघाची निवड केली आहे. निवडकर्त्यांनी इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे. त्यांची मते जाणून घेतल्यानंतरच १५ सदस्यीय संघाला अंतिम रुप देण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारी संध्याकाळी (०६ सप्टेंबर) किंवा मंगळवारी सकाळी (०७ सप्टेंबर) बीसीसीआय संघ जाहीर करू शकतो.’
यापूर्वी बीसीसीआयच्या एका सूत्राने माहिती दिली होती की, इंग्लंड-भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना संपल्यानंतर आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ घोषित केला जाईल. इंग्लंड आणि भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना ओव्हल येथे चालू असून सोमवारी या सामन्याचा शेवटचा दिवस आहे. हा सामना लवकर संपल्यास सोमवारी सकाळीच भारतीय टी२० विश्वचषक संघ जाहीर होऊ शकतो.
३ क्रिकेटपटूंना राखीव खेळाडूच्या रुपात मिळेल जागा
टी२० विश्वचषकासाठी मुख्य संघात १५ खेळाडूंना सहभागी करण्याची मुभा आहे. त्यांच्याव्यतिरिक्त ३ खेळाडूंना राखीव विभागात जागा दिली जाईल. अशात कोणते खेळाडू मुख्य संघाचे दावेदार ठरतील आणि कोणाला राखीव खेळाडूच्या रुपात या मोठ्या स्पर्धेचा भाग होता येईल?, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सरासरी गोलंदाजी, फ्लॉप फलंदाजी, आता ‘या’ गोष्टीतही चुकला; अंतिम कसोटीत जडेजाला नारळ पक्का!
अगग! स्वत: पंतनेही सोडली होती आशा; पण झालं असं काही की, तिघे मिळूनही करु शकले नाहीत धावबाद





