-गजानन भुमरे
आताच्या काळात भारतीय क्रिकेट संघ जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. मागच्या काही वर्षात भारताने क्वचितच पराभव पाहिले आहेत. संघात युवा खेळाडू आणि वरिष्ठ खेळाडूंचे योग्य मिश्रण आहे. यामुळे भारतीय क्रिकेट संघ आज नवनवीन उंची गाठत आहे. पण अशातच असे काही भारतीय खेळाडू आहेत ज्यांना फॉर्म आणि फिटनेस या दोन्ही गोष्टींची चिंता सतावत आहेत. त्याच कारणाने ते कदाचित निवृत्तीचा निर्णय लवकर घेऊ शकतात. अशाच ४ खेळाडूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
शिखर धवन
भारतीय संघात शिखर धवनचे योगदान शानदार राहिले आहे. २०१३ पासून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारतीय संघात शिखर धवनचे स्थान सलामीवीर फलंदाज म्हणून खूप महत्त्वाचे राहिले. मात्र २०१८ पासून धवन कसोटी संघात दिसला नाही. पण असे असले तरी तो त्याचे वनडे आणि टी२० संघातील स्थान टिकवून आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून फिटनेसच्या कारणांमुळे तो त्रस्त झाला आहे.
२०१९ विश्वचषकापासून तो सातत्याने झालेल्या दुखापतींमुळे भारतीय संघापासून बरेच दिवस बाहेर आहे. त्यामुळे कदाचित तो या दुखापतींमुळे किमान कसोटी क्रिकेटमधून तरी निवृत्त होण्याचा विचार करु शकतो. कारण सध्या कसोटी संघात रोहित शर्मा, मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल असे सलामीवीर म्हणून भारतीय संघाकडे पर्याय देखील आहेत. त्यामुळे शिखरचे कसोटीतील पुनरागमन तरी कठिण दिसून येत आहे.
त्याचबरोबर तो आता ३४ वर्षांचा आहे. त्याच्या वयाचा विचार करायचा झाला तरी तो काही काळानंतर निवृत्तीचा विचार करु शकतो.
दिनेश कार्तिक – भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक २०१९ विश्वचषकापासून भारतीय संघातून बाहेर आहे. तसेच तो २०१८ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला आहे. त्याचबरोबर तो मागील काही महिन्यांपासून त्याच्या खराब फॉर्मशी देखील संघर्ष करत आहे.
याबरोबरच सध्या भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाजांचा विचार करायचा झाल्यास निवड समितीने मागील काही महिन्यात संजू सॅमसनला मर्यादीत षटकांच्या सामन्यांसाठी तर वृद्धिमान सहाला कसोटीसाठी पसंती दिली आहे. तसेच रिषभ पंत भारताच्या तिन्ही क्रिकेट प्रकारच्या संघात कायम आहे. एवढेच नाही तर मागील काही सामन्यांमध्ये केएल राहुलने देखील यष्टीरक्षक फलंदाज म्हणून आपली योग्यता सिद्ध केली आहे.
या सर्व गोष्टींचा विचार केल्यास कार्तिकला आता पुन्हा भारतीय संघात पुनरागमन करायचे असल्यास बरीच मेहनत घ्यावी लागणार असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर तो आता ३५ वर्षांचा असल्याने त्याचे वयही त्याच्या विरुद्ध जाऊ शकते. त्यामुळे तो किमान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार करु शकतो.
एमएस धोनी – धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात बांगलादेश विरुद्ध २३ डिसेंबर २००४ ला वनडे सामन्यातून केली. तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. तसेच भारताला तीन आयसीसी ट्रॉफी मिळवून देणारा एकमेव कर्णधारही आहे. पण ५०० पेक्षा अधिक अंतरराष्ट्रीय सामने खेळलेला धोनी आता लवकरच निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. तो २०१९ च्या विश्वचषकानंतर क्रिकेट खेळलेला नाही.
तसेच त्याच्या भविष्याबद्दलही सध्या मोठ्या प्रमाणात सातत्याने चर्चा होत आहे. याबरोबरच तो येत्या ७ जूलैला वयाची ३९ वर्षे पूर्ण करत आहे. त्यामुळे त्याचे वय देखील त्याच्या विरोधात आहे. याबरोबरच धोनीने आत्तापर्यंत एखाद्या खेळाडूचे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे यश मिळवण्याचे स्वप्न असते ते सर्व जवळजवळ मिळवले आहे. तसेच त्याने याआधीच डिसेंबर २०१४ ला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे तो जरी पुढे आयपीएलमध्ये खेळत राहिला तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो.
भुवनेश्वर कुमार – भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने २०१२ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने अनेकदा भारताच्या विजयांमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. तो भारतीय गोलंदाजी फळीतील एक प्रमुख गोलंदाज होता. पण गेल्या दिडवर्षात भुवनेश्वर सातत्याने दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे तो भारतीय संघामधूनही बाहेर आहे.
त्याने या दिडवर्षात भारतीय संघात पुनरागमन करण्याचाही प्रयत्न केला परंतू पुन्हा तो दुखापतग्रस्त झाला. अखेर यावर्षी जानेवारीमध्ये लंडन येथे त्याची स्पोर्ट हर्नियाची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे या सततच्या दुखापतीमुळे कदाचित भुवनेश्वर निदान एका क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेण्याचा विचार करु शकतो.
ट्रेंडिंग लेख –
हवामान, खेळपट्टी, विरोधी संघ या कशाचाच अजिबात फरक न पडणारे जगातील ३ क्रिकेटर्स
सर्वात कमी वयात आयपीएलमध्ये शतक करणारे ५ क्रिकेटपटू
सोशल मीडियावर सर्वाधिक चलती असलेले ५ भारतीय क्रिकेटर, पहा कोण आहे तिसऱ्या क्रमांकावर