भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात येत्या काही दिवसातच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. साउथॅम्प्टनच्या मैदानावर १८ ते २२ जून दरम्यान हा सामना रंगणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने २० सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघातील खेळाडूंचा फॉर्म आणि भारतीय संघाची गेल्या काही सामन्यातील कामगिरी पाहता, त्यांना विजयाचा प्रबळ दावेदार म्हटले जात आहे. परंतु भारतीय संघाच्या विजयाचा भार संघातील काही मुख्य खेळाडूंवर असमार आहे.
ते खेळाडू जर या मोठ्या सामन्यात फ्लॉप ठरले; तर भारतीय संघाचे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न स्वप्नचं राहू शकते. परंतु त्यांनी दमदार प्रदर्शन केले, तर पहिलीवहिली कसोटी अजिंक्यपद ट्रॉफी भारताच्या नावे होऊ शकते. चला तर पाहूया कोण आहेत ते मुख्य खेळाडू?
१) चेतेश्वर पुजारा : भारतीय संघाची ‘नवी द वॉल’ म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या चेतेश्वर पुजाराने संघाला अनेक सामन्यात विजय मिळवून दिला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या २०१८-१९ कसोटी मालिकेत चेतेश्वर पुजाराने मोलाची भूमिका बजावली होती. त्याच्या कामगिरीची दखल घेत त्याला ‘मालिकावीर’ पुरस्कार देण्यात आला होता. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील भारतीय संघाला विजय मिळवायचा असेल; तर ही भिंत मजबूत असणे गरजेचे असणार आहे. जर चेतेश्वर पुजारा गोलंदाजांचा घाम काढण्यास यशस्वी ठरला तर संघातील इतर खेळाडू येऊन सहजरित्या धावा करू शकतात.
२) रोहित शर्मा : भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा हादेखील गेल्या काही महिन्यांपासून चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे. त्याला २०१९ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये देखील सलामी फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली होती. या संधीचे सोने करत त्याने दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत ३ शतक झळकावले होते. यामध्ये एका द्विशतकाचा समावेश होता. त्यानंतर त्याने मागील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत भरपूर धावा कुटल्या आहेत. त्यामुळे आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील रोहित शर्माकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
३) जसप्रीत बुमराह : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यातून माघार घेतली होती. त्यानंतर आयपीएल २०२१ स्पर्धेत त्याच्या गोलंदाजीचा इकोनॉमी रेट चांगला होता. परंतु त्याला अधिक गडी बाद करण्यात यश आले नव्हते. मात्र त्याची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी ही उल्लेखनीय राहिली आहे.
आकडेवारी पाहून तुम्हाला याचा अंदाज येईलच. त्याने आतापर्यंत एकूण १८ कसोटी सामने खेळले आहेत. यात २२.११ च्या सरासरीने त्याने ८३ गडी बाद केले आहेत. जसप्रीत बुमराह नवीन चेंडूने डावाची सुरुवात करेल, त्यामुळे त्याच्यावर लवकरात लवकर किवी फलंदाजांना माघारी धाडण्याची जबाबदारी असणार आहे. जर त्याला गडी बाद करून देण्यात यश आले तर भारतीय संघ कमी धावांवर प्रतिस्पर्धी संघाचा डाव रोखू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
“पुर्वी १० पैकी ९ युवक धोनी किंवा कोहलीसारखं बनू इच्छित असे, पण आता..,” दिग्गजाचे लक्षवेधी भाष्य
‘सरजी’ आले! अष्टपैलू रविंद्र जडेजा मुंबईत दाखल, हटके फोटो शेअर करत वेधले लक्ष
मुंबईत जन्मलेला न्यूझीलंडचा ‘हा’ फिरकीपटू भारतीयांची उडवणार दाणादाण, WTC फायनलसाठी आहे उत्सुक