कोणताही क्रिकेट संघ दमदार फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलू आणि यष्टीरक्षकासह परिपूर्ण बनतो. सामना जिंकण्यासाठी जितकी फलंदाजांची महत्त्वाची भूमिका तितकेच गोलंदाजांचेही योगदान महत्त्वपुर्ण ठरते. मागील काही काळापासून भारतीय कसोटी संघातील गोलंदाजांनी अतुलनीय प्रदर्शन केले आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा अशा अनुभवी गोलंदाजांच्या पावलावर पाऊल ठेवत युवा गोलंदाजांनीही त्यांचा ठसा उमटवला आहे.
या सिनियर गोलंदाजांसह मोहम्मद सिराज, टी नटराजन यासारखे वेगवान गोलंदाज असो वा अक्षर पटेलसारखे फिरकीपटू, अशा बऱ्याचशा युवा गोलंदाजांनीही भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात पोहोचवण्यात मोलाचे योगदान दिले आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज लक्ष्मीपती बालाजी याने भारतीय कसोटी संघाच्या गोलंदाजी आक्रमणाचे तोंडभरुन कौतुक केले आहे.
बालाजी म्हणाला की, “सुरुवातीच्या काळात पहिल्या दहामधील ९ युवा खेळाडू विराट कोहली, सचिन तेंडूलकर किंवा एमएस धोनीसारखे बनण्याची इच्छा बाळगत असायचे. परंतु आजकालचे युवा शिलेदार जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि जहीर खान यांच्यासारखे बनू इच्छितात. बुमराहच्या गोलंदाजांची गती, शमीचे मॉर्डन डे क्रिकेटमधील कौशल्य आणि इशांतचा दीर्घ अनुभव या गोष्टींनी वेगवान गोलंदाजांची महत्ता बदलली आहे.”
“वर्तमान काळात आपल्याकडे शमी आणि बुमराह यांसारखे कुशल वेगवान गोलंदाज आहेत. त्यांना आताही एकाचवेळी संघात दिले जाऊ शकते. इशांतलाही गरजेनुसार भारतीय संघात स्थान दिले जाते. याखेरीज भारतीय संघाकडे भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि इतर बरेचसे वेगवान गोलंदाज उपलब्ध आहेत. यामुळे भारतीय संघाकडे गोलंदाजांचा एक मोठा दल निर्माण झाला आहे. हे सर्व गोलंदाज त्याच उत्कटतेने आणि उत्साहाने गोलंदाजी करु शकतात. यामुळेच भारतीय कसोटी संघ सलग २० विकेट्स घेण्यात सक्षम बनला आहे,” असे त्याने पुढे म्हटले.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात २०२०-२१ मध्ये झालेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने ३-१ ने विजय मिळवला होता. या कसोटी मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यातील दोन्ही डावात भारतीय संघाने इंग्लंडला सर्वबाद केले होते. अर्थातच भारतीय गोलंदाजांनी सलग ३ वेळा एका सामन्यात २० विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सरजी’ इस बॅक! अष्टपैलू रविंद्र जडेजा मुंबईत दाखल, हटके फोटो शेअर करत वेधले लक्ष
मैदानावर गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या सचिनचं ‘या’ व्यक्तीपुढे झालं होतं अवघड
‘भारताचे गॅरी सोबर्स’ अशी ओळख मिळवणारे दिग्गज, २६ सामन्यांच्या कारकिर्दीत रचला होता विक्रमांचा ढीग