कसोटी क्रिकेट हा क्रिकेट प्रकारातील सर्वात धीमा प्रकार मानला जातो. प्रत्येक दिवशी साधारण ८ तासात ९० षटकांचा खेळ होतो. त्यामुळे प्रत्येक दिवशी फलंदाजांसमोर संयमी खेळ करण्याचे आव्हान असते. पण असे असले तरी काही फलंदाज असे आहेत ज्यांनी कसोटीतही आक्रमक खेळी केल्या आहेत. कसोटीमध्ये आत्तापर्यंत ६ क्रिकेटपटू असे आहेत, ज्यांनी अर्ध्यातासात म्हणजेच केवळ ३० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत अर्धशतकाला गवसणी घातली आहे. अशाच ६ क्रिकेटपटूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
६. ब्रुस टेलर – ३० मिनिटे
कसोटीमध्ये वेळेच्या तुलनेत सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत न्यूझीलंडचे ब्रुस टेलर सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी १९६९ मध्ये ऑकलंड येथे वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या सामन्यात पहिल्या डावात केवळ ३० मनिटात अर्धशतक केले होते. त्यांनी त्या डावात एकूण १११ मिनिटे फलंदाजी करताना १२४ धावा केल्या होत्या होत्या.
त्या सामन्यात त्यांच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ३२३ धावा केल्या होत्या. तसेच वेस्ट इंडिजला पहिल्या डावात २७६ धावाच करता आल्या होत्या. तर दुसऱ्या डावात न्यूझीलंडने २९७ धावांवर डाव घोषित करत पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीसह वेस्ट इंडिजला ३४५ धावांचे आव्हान दिले होते.
हे आव्हान वेस्ट इंडिजने सिमर नर्स यांनी केलेल्या १६८ धावांच्या मदतीने ६९ षटकात सहज पार करत सामना जिंकला होता. या सामन्यात न्यूझीलंडकडून टेलर यांनी ३ विकेट्सही घेतल्या होत्या.
५. फोफी विल्यम्स – ३० मिनिटे
वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू फोफी विल्यम्स यांनी कारकिर्दीत केवळ ४ कसोटी सामने खेळले. तसेच १ अर्धशतक केले आहे. पण हे अर्धशतक त्यांच्यासाठी खास ठरले. त्यांनी हे अर्धशतक जानेवारी १९४८ मध्ये इंग्लंडविरुद्ध ब्रिजटाऊन येथे खेळताना वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात केले होते. त्यांनी त्या डावात अर्धशतक पूर्ण करण्यासाठी केवळ ३० मिनिटांचा कालावधी घेतला.
त्या डावात त्यांनी एकूण ६३ मिनिटे फलंदाजी करताना ७२ धावा केल्या होत्या. त्या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात २९६ धावा केल्या होत्या. तर इंग्लंडने २५३ धावा पहिल्या डावात केल्या होत्या. वेस्ट इंडिजने दुसरा डाव विल्यम्स यांच्या तुफानी अर्धशतकाच्या मदतीने आणि ख्रिस्तीयानी व फर्ग्यूसन यांच्या अर्धशतकासह ३५१ धावांवर घोषित केला होता आणि इंग्लंडला ३९५ धावांचे आव्हान दिले होते.
परंतू इंग्लंड ८६ धावांवर ४ बाद अशा अवस्थेत असताना सामन्याचे ५ दिवस पूर्ण झाल्याने हा सामना अनिर्णित राहिला.
४. सलीम दुरानी – २९ मिनिटे
भारताचे अष्टपैलू क्रिकेटपटू सलीम दुरानी हे कसोटीमध्ये वेळेच्या तुलनेत सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी फेब्रुवारी १९६४ ला इंग्लंडविरुद्ध कानपूर येथे खेळताना केवळ २९ मिनिटात अर्धशतक केले आहे.
त्यांनी हे अर्धशतक भारताच्या दुसऱ्या डावात खेळताना केले. त्यावेळी त्यांनी त्या डावात एकूण ३४ मिनिटे फलंदाजी करताना नाबाद ६१ धावा केल्या होत्या. पण ते फलंदाजी करत असनाच सामन्याचे ५ मिनिटे संपले असल्याने ते ६१ धावांवर नाबद राहिले.
त्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिला डाव ५५९ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर फलंदाजीला उतरलल्या भारतीय संघाला पहिल्या डावात २६६ धावाच करता आल्या. त्यामुळे तब्बल २९३ धावांनी पिछाडीवर पडलेल्या भारताला इंग्लंडने फॉलोऑन दिला. त्यावेळी भारतीय संघ दुसऱ्या डावात ३ बाद ३४७ धावांवर असताना ५ व्या दिवसाचा खेळ संपल्याने सामना अनिर्णित राहिला.
३. जॅक ब्राऊन – २८ मिनिटे
इंग्लंडचे माजी फलंदाज जॅक ब्राऊन यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण ८ सामने खेळले. त्यात त्यांनी १ शतक आणि १ अर्धशतक केले. त्यांनी केलेले शतक हे त्यांच्यासाठी खास ठरले. कारण त्या शतकावेळी त्यांनी पहिल्या ५० धावा केवळ २८ मिनिटात केल्या होत्या. ही खेळी त्यांनी मार्च १९९५ ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न येथे खेळताना केली होती.
त्या सामन्यात त्यांनी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ही खेळी केली होती. त्या डावात त्यांनी ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २९७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १४५ मिनिटे फलंदाजी करताना १४० धावा केल्या होत्या. त्यांच्या या शतकी खेळीमुळे इंग्लंडने ८९ षटकांच्या आत हे आव्हान पूर्ण करत सामना जिंकला होता.
त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ४१४ धावा केल्या होत्या. तर इंग्लंडने पहिल्या डावात ३८५ धावा केल्या होत्या. त्यांनंतर ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात २६७ धावाच करता आल्याने त्यांनी पहिल्या डावातील २९ धावांच्या आघाडीसह इंग्लंडला २९७ धावांचे आव्हान दिले होते.
२. मोहम्मद अश्रफुल – २७ मिनिटे
बांगलादेशचा मधल्या फळीतील फलंदाज मोहम्मद अश्रफुल वेळेच्या तुलनेत कसोटीमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २००७ ला ढाका येथे भारताविरुद्ध खेळताना केवळ २७ मिनिटात अर्धशतक केले होते. त्याने हा कारनामा या सामन्यात बांगलादेशकडून दुसऱ्या डावात खेळताना केला होता.
भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिनेश कार्तिक, वासिम जाफर, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या शतकाच्या जोरावर पहिला डाव ६१० धावांवर घोषित केला होता. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या बांगलादेशला पहिल्या डावात केवळ ११८ धावाच करता आल्याने तब्बल ४९२ धावांची पिछाडी स्विकारावी लागली. त्यामुळे भारताने त्यांना फॉलोऑन दिला.
दुसऱ्या डावात बांगलादेशकडून अश्रफुल आणि मश्रफे मोर्तझाने अर्धशतके करत चांगली लढत दिली होती. परंतू या डावात बांगलादेशला २५३ धावाच करता आल्याने पराभवाचा सामना करावा लागला. या डावात मोर्तझाने ७० धावा केल्या होत्या. तर अश्रफुलने आक्रमक खेळताना ४६ मिनिटे फलंदाजी करताना ४१ चेंडूत ६१ धावा केल्या होत्या. यावेळी त्याने २७ मिनिटात अर्धशतक पूर्ण केले होते.
१. मिस्बाह-उल-हक – २४ मिनिटे
पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटपटू मिस्बाह उल हक कसोटीत वेळेच्या तुलनेनुसार तसेच चेंडूच्या तुलनेतही कसोटीमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.
त्याने नोव्हेंबर २०१४ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अबुधाबीमध्ये खेळताना दुसऱ्या डावात ५ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना केवळ ५६ चेंडूत शतकी खेळी केली होती. त्याने त्या डावात ५७ चेंडूत ११ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद १०१ धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याने केवळ २१ चेंडूंचा सामना करताना आणि २४ मिनिटात पहिल्या ५० धावा पूर्ण केल्या होत्या.
विशेष म्हणजे मिस्बाहने या सामन्यातील पहिल्या डावातही शतकी खेळी केली होती. त्याने पहिल्या डावात १६८ चेंडूत १०१ धावा केल्या होत्या.
या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पहिला डाव ५७० धावांवर घोषित केला होता. तर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात २६१ धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानने ३०९ धावांची आघाडी घेतली.
पाकिस्तानने दुसरा डाव २९३ धावांवर घोषित करत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावातील ३०९ धावांच्या आघाडीसह ६०३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ २४६ धावांवरच संपुष्टात आल्याने पाकिस्तानने या सामन्यात सहज विजय मिळवला होता.
ट्रेंडिंग लेख –
वनडेत वेगवान दीडशतकी खेळी करणारे ५ फलंदाज
६०पेक्षा कमी चेंडूत कसोटीत तुफानी शतक करणारे ४ फलंदाज
केवळ आणि केवळ एका धावेमुळे हुकली होती ‘या’ ६ दिग्गज भारतीयांची शतकं