इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल २०२१) तेराव्या हंगामातील एलिमेनेटरचा सामना सोमवारी (११ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. शारजा क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दिलेले १३९ धावांचे आव्हान कोलकाताने अखेरच्या षटकात पूर्ण केले. मात्र, या सामन्यात पंचगिरी करत असलेल्या वीरेंद्र शर्मा यांच्यावर बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली चांगलाच भडकलेला दिसला.
तीन निर्णय गेले बेंगलोरच्या विरोधात
अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्यात अखेरच्या षटकापर्यंत रोमांचकता कायम होती. परंतु, या सामन्यात पंचांची कामगिरी अत्यंत खराब झालेली दिसली. भारतीय पंच वीरेंद्र शर्मा यांनी दिलेले तीन निर्णय बेंगलोरच्या विरोधात गेले. बेंगलोर संघ फलंदाजी करत असताना शहाबाज अहमद व हर्षल पटेल यांना त्यांनी बाद ठरवले होते. मात्र, तिसऱ्या पंचांकडे दाद मागितल्यानंतर ते दोघेही नाबाद असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, कोलकाताच्या डावात कोलकाताचा फलंदाज राहुल त्रिपाठी पायचीत असल्याचे स्पष्ट दिसत होते. मात्र, शर्मा यांनी त्याला नाबाद ठरवलेले. यावरही विराटने डीआरएसची मागणी केल्यानंतर राहुल बाद असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर विराटने शर्मा यांच्याकडे जाऊन तुम्ही सातत्याने चुकीचे निर्णय देत असल्याचे निदर्शनास आणून दिले. पंचांच्या या खराब कामगिरीची सोशल मीडियावर देखील चांगली चर्चा झाली.
https://twitter.com/SudattShakya/status/1447609832324755460?t=lz9lClgwlEG_6AWMe_-9hg&s=19
कोलकाताचा क्वालिफायरमध्ये प्रवेश
बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पावर प्लेमध्ये शानदार सलामी दिल्यानंतर बेंगलोरचा डाव कोसळला. डिव्हिलियर्स व मॅक्सवेल हे दिग्गज खेळाडू अपयशी ठरल्याने बेंगलोरला निर्धारित २० षटकात केवळ १३८ धावा काढता आल्या. कोलकातासाठी सुनील नरीनने चार व लॉकी फर्ग्युसनने दोन बळी मिळवले. प्रत्युत्तरात, शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर व सुनील नरीन यांनी छोट्या मात्र उपयुक्त खेळ्या करत संघाला विजयाच्या जवळ नेले. शकीब अल हसन आणि कर्णधार ओएन मॉर्गन यांनी अखेरपर्यंत संयम दाखवत संघाला अखेरच्या षटकात विजय मिळवून दिला. कोलकाता आता क्वालिफायर २ मध्ये दिल्ली कॅपिटल्सशी भिडेल.






