इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू आहे. दोन्ही संघ सध्या या मालिकेत १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ १९१ धावांवर सर्वबाद झाला. दरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली याने संयमी अर्धशतक झळकावले. या अर्धशतकासह विराटने अजून एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
विराटने कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये सर्वाधिक अर्धशतकीय खेळी केल्या आहेत. याआधी हा विक्रम भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावे होता. धोनीने इंग्लंडमध्ये ६ वेळा अर्धशतकीय खेळ्या केल्या होत्या. लीड्स कसोटीत विराटने धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली होती. त्यानंतर चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पुन्हा तो अर्धशतकीय खेळी करत कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये सर्वाधिक ७ वेळा पन्नासपेक्षा अधिक धावा करणारा कर्णधार बनला. विराटने ९६ चेंडूंमध्ये ८ चौकारांच्या मदतीने ५० धावा केल्या.
या यादीत अजून काही भारतीय कर्णधारांची नावे आहेत. माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने ४ वेळा ही कामगिरी केली होती. तर मोहम्मद अझरुद्दीन आणि विजय हजारे यांनी प्रत्येकी ३ वेळा ही कामगिरी केली होती.
ओव्हल कसोटीत प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला सुरुवात चांगली करता आली नाही. भारताचे रोहित शर्मा (११), केएल राहुल (१७), चेतेश्वर पुजारा (४), रिषभ पंत (९), अजिंक्य रहाणे (१४) रविंद्र जडेजा (१०) हे प्रमुख फलंदाज मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले. केवळ विराटने ५० धावा करत थोडीफार झुंज दिली. विराट पुन्हा एकदा चांगल्या लयीत दिसत होता किंतु त्याची शतकीय खेळी पाहण्यासाठी चाहत्यांना अजून वाट पाहावी लागेल.
जरी प्रमुख फलंदाज अपयशी ठरले तरीही, तळातल्या फळीत फलंदाजीसाठी आलेल्या अष्टपैकू शार्दुल ठाकूरने मात्र, आक्रमक फलंदाजी केली. त्याने ३६ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. त्यामुळे सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव अवघ्या १९१ धावांवर संपुष्टात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“ती अश्विनला शोधतेय”, चौथ्या कसोटीत संधी न मिळाल्याने अश्विनच्या पत्नीचा उपहासात्मक व्हिडिओ
जडेजाला फलंदाजीत बढती दिल्याने तब्बल १३ वर्षांनी घडली ‘ती’ घटना, गांगुली होता शेवटचा फलंदाज