रांची। जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे आज(22 ऑक्टोबर) भारताने दक्षिण आफ्रिके विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात 1 डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला आहे.
या विजयाबरोबरच भारताने 3 सामन्यांची कसोटी मालिका 3-0 अशा फरकाने जिंकत दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश दिला आहे. त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिकेला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश देणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे.
याआधी कोणत्याही भारतीय कर्णधाराला दक्षिण आफ्रिकेला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश देता आला नव्हता.
त्याचबरोबर विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 कसोटी मालिका जिंकणाराही पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी सौरव गांगुली आणि सचिन तेंडूलकर यांनी प्रत्येकी एका कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवला आहे.
विराटने याआधी 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून 3-0 ने विजय मिळवला होता. या मालिकेतील एक सामना अनिर्णित राहिला आहे.






