भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे पार पडलेल्या सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने भारताला या सामन्यात ४२० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला ५८.१ षटकात सर्वबाद १९२ धावाच करता आल्या.
भारताच्या या दुसऱ्या आणि सामन्याच्या चौथ्या डावात भारतीय कर्णधार विराट कोहली याने ७२ धावा केल्या. १०४ चेंडूंचा सामना करताना ९ चौकारांच्या मदतीने त्याने ही धावसंख्या केली. यासह कसोटीतील एक शानदार विक्रम विराटच्या नावावर झाला आहे. विराट हा चेन्नई येथील कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात ५० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला आणि एकमेव भारतीय कर्णधार ठरला आहे.
विराटपुर्वी एमएस धोनी, सौरव गांगुली यांसारख्या कित्येक भारतीय कर्णधारांनी चेन्नईच्या मैदानावर कसोटी सामने खेळले आहेत. परंतु त्यापैकी कुणालाही अखेरच्या डावात ३० पेक्षा जास्त धावांचा टप्पा पार करता आला नाही.
क्रिकेट जगतातील कर्णधारांविषयी बोलायचे झाले तर, विराटपुर्वी वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार गॅरी सोबर्स यांनी हा पराक्रम केला होता. १९६७ मध्ये भारताविरुद्ध चेन्नई येथे झालेल्या कसोटी सामन्यातील चौथ्या डावात त्यांनी नाबाद ७४ धावा केल्या होत्या. या खेळीदरम्यान त्यांनी १ षटकार आणि ९ चौकार मारले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
अंडरसनने उडवल्या एका षटकात २ भारतीयांच्या दांड्या अन् सर्वांना आठवली लक्ष्मण-गांगुलीची ‘ती’ विकेट
मानलं पाहिजे तुला भावा! वयाची तिशी पार केल्यानंतर अंडरसनने घेतल्यात ३००हून जास्त विकेट्स






