भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा संपल्यानंतर भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. विराटने मागच्या महिन्यात हा निर्णय घेतला होता आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून याची घोषणा केली होती. विराटच्या या निर्णयाबद्दल अनेकांनी त्यांची मते स्पष्ट केली आणि अनेकांनी विराटने हा निर्णय का घेतला याचे वेगवेगळे अंदाजही लागले होते.
विराटने यापूर्वीच त्याच्या या निर्णयाविषयी स्पष्टीकरण दिले आहे, तरीही त्याला याविषयी अजूनही प्रश्न विचारले जातात. अशात आता विराटने याविषयी आता कसलीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
विराट टी२० विश्वचषकात २४ ऑक्टोबरला खेळल्या जाणाऱ्या सामन्यापूर्वी माध्यमांशी बोलत होता. त्याला यावेळी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाविषयी प्रश्न विचारला गेला. यावर उत्तर देत तो म्हणाला की, “मी आधीच खूप काही बोललो आहे आणि मला नाही वाटत की, या मुद्द्यावर अजून काही बोलण्याची गरज आहे.”
कोहलीला याविषयी प्रश्न विचारल्यानंतर तो संतापलेला दिसला आणि पुढे बोलताना म्हणाला की, “आमचे लक्ष या विश्वचषकात चांगले खेळण्यावर आहे आणि एका संघाच्या रूपात आम्ही जे करण्याची आवश्यकता आहे, ते करायचे आहे. बाकीचे लोक त्या गोष्टींना खोदण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्या अस्तित्वात नाहीत आणि मी काही असा व्यक्ती नाही, जो असाच कोणालाही मसाला देईल. मी खपुच इमानदारीने आणि स्पष्टपणे गोष्टी समजावल्या आहेत. जर लोकांना वाटते आहे की, याव्यतिरिक्तही काही आहे, जे मी पहिल्यांदा सांगितले नाहीये, तर मला त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटते. निश्चित तसे काही नाही.”
दरम्यान, कर्णधार विराट सध्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. विश्वचषकात भारतीय संघ यावर्षी स्पर्धेच्या जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानला जात आहे. विश्वचषकात भारतीय संघाने सराव सामन्यात पहिल्यांदा इंग्लंड आणि नंतर ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांना धुळ चारली आहे. भारतीय संघ विश्वचषकातील अभियानाला पाकिस्तानविरुद्धच्या (२४ ऑक्टोबर) सामन्याने सुरुवात करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सुरमा मार्करम! पहिल्याच सामन्यात टिपला नजरेचे पारणे फेडणारा झेल; पाहा व्हिडिओ