भारत विरुद्ध श्रीलंका संघातील पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल रविवारी (०६ मार्च) लागला. भारतीय संघाने एक डाव आणि २२२ धावांच्या मोठ्या फरकाने सामना खिशात घातला. या सामन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (४ मार्च) मैदानावर पाऊल ठेवताच माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला होता. तो विक्रम इतर कोणता नसून भारतीय संघाकडून १०० कसोटी सामने खेळण्याचा विक्रम होता. असा कारनामा करणारा विराट १२ वा भारतीय खेळाडू ठरला. यावेळी त्याने एवढा मोठा प्रवास करण्याच्या प्रसंगी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी संपूर्ण संघासमोर त्याला खास कॅप देऊन गौरवले होते. तसेच रोहित शर्माने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विराटला ‘गार्ड ऑफ ऑनर‘ देऊनही त्याचा सन्मान केला होता. आता १०० कसोटी सामन्यांच्या प्रवासाच्या खास प्रसंगी विराटने बीसीसीआयसह आपल्या सर्व मित्रमंडळींना आणि कुटुंबाला धन्यवाद दिला.
सामना संपल्यानंतर विराटने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत बोर्ड आणि संघसहकाऱ्यांना धन्यवाद दिला. विराटने ट्वीट करत लिहिले की, “इथपर्यंत पोहोचण्याचासाठी खूप मोठा प्रवास केला. शिकवून जाणारे खूप चढ-उतार आले. हे इतर कोणत्याही मार्गाने पूर्ण झाले नसते. तुमच्या सहकार्यासाठी धन्यवाद.”
Been a long journey to get here. Full of ups and downs and learnings. Would not have had it any other way. Thank you for all your support 🇮🇳🙏🏻 pic.twitter.com/Q5Vdtz8s1K
— Virat Kohli (@imVkohli) March 6, 2022
या व्हिडिओत विराटने लिहिले की, “माझे कुटुंब, सहकारी, प्रशिक्षक आणि बीसीसीआय धन्यवाद. तुम्ही चढ-उतारांनी भरलेल्या माझ्या या प्रवासाला खूप सुंदर बनवले.”
विराटच्या या व्हिडिओला आतापर्यंत ७० हजारांहून लाईक्स मिळाले आहेत. तसेच चाहते या व्हिडिओवर कमेंट्सचाही पाऊस पाडत आहेत.
#TeamIndia Head Coach Rahul Dravid presents @imVkohli with his 100th baggy blue to commemorate his 100th appearance in whites.#VK100 | #INDvSL | @Paytm pic.twitter.com/PVFhsbe4Rj
— BCCI (@BCCI) March 4, 2022
श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली कसोटीतील पहिल्या सामन्यात विराटने भारतासाठी १०० कसोटी सामने खेळणारा १२ वा खेळाडू बनन्याचा मान पटकावला. विराटपूर्वी सचिन तेंडुलकर (२०० कसोटी), राहुल द्रविड (१६३ कसोटी), व्हीव्हीएस लक्ष्मण (१३४ कसोटी), अनिल कुंबळे (१३२ कसोटी), कपिल देव (१३१ कसोटी), सुनील गावसकर (१२५ कसोटी), दिलीप वेंगसरकर (११६ कसोटी), सौरव गांगुली (११३ कसोटी), इशांत शर्मा (१०५ कसोटी), हरभजन सिंग (१०३ कसोटी) आणि वीरेंद्र सेहवाग (१०३ कसोटी) या खेळाडूंनी हा कारनामा केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: ‘रेकॉर्डब्रेक’ कामगिरीनंतर हॉटेलवर जड्डूचे दिमाखदार स्वागत