भारताचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी (१६ सप्टेंबर) टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेनंतर टी२० कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा करत सर्वांना चकीत केले. विराटने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करत हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे आता १७ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टी२० विश्वचषकात विराट अखेरचे भारतीय टी२० संघाचे नेतृत्व करताना दिसेल. असे असले तरी विराट भारताचा वनडे आणि कसोटी कर्णधार म्हणून मात्र कायम राहाणार आहे.
विराटची टी२० कर्णधार म्हणून कामगिरी
विराट गेल्या ४ वर्षापासून भारताच्या टी२० संघाचा नियमित कर्णधार आहे. २०१७च्या सुरुवातील एमएस धोनीने मर्यादीत षटकांच्या भारतीय संघांचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराटकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती.
विराटने सर्वप्रथम भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व २६ जानेवारी २०१७ रोजी इंग्लंडविरुद्ध कानपूर येथे केले होते. तेव्हापासून तो नियमितपणे ही जबाबदारी सांभाळत होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ४५ टी२० सामने खेळले आहेत. त्यातील २७ सामने सामने जिंकले असून १४ सामन्यांत पराभव स्विकारावा लागला आहे. त्याचबरोबर २ सामने बरोबरीत सुटले आहेत, तर २ सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
विराटने आत्तापर्यंत १७ टी२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्यातील १२ मालिका भारताने जिंकल्या असून ३ मालिका बरोबरीत सुटल्या आहेत. तर २ मालिकेच पराभव स्विकारला आहे. यातील ९ मालिका भारताने विराटच्या नेतृत्वाखाली भारताबाहेर खेळल्या आहेत. त्यातील ७ मालिका जिंकल्या आहेत, तर १ मालिका बरोबरीत झाली असून १ मालिका पराभूत झाली आहे. त्याने ऑस्ट्रिलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशातही कर्णधार म्हणून विजय मिळवले आहेत.
भारताचा दुसरा यशस्वी टी२० कर्णधार
विराट हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी टी२० कर्णधार आहे. त्याने २७ विजयांसह हा क्रमांक मिळवला आहे. तसेच सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या जागातील टी२० कर्णधारांमध्ये विराट ५ व्या क्रमांकावर आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर ४२ विजयांसह अफगाणिस्तानचा असगर अफगाण आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर ४१ विजयांसह एमएस धोनी आहे. ओएन मॉर्गन ३७ विजयांसह तिसऱ्या, तर २९ विजयांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा
विराट आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार आहे. त्याने नेतृत्व केलेल्या ४५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ४८.४५ च्या सरासरीने १५०२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने १२ अर्धशतके केली असून नाबाद ९४ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताची पुढील पिढी घडवणार ‘लेफ्टनंट कर्नल धोनी’, संरक्षण मंत्रालयाने दिली ‘ही’ जबाबदारी
बिग ब्रेकिंग! विराट कोहली देणार टी२० कर्णधारपदाचा राजीनामा, भावनिक पोस्टसह केली घोषणा
टी२० विश्वचषकाआधी विराटसमोर चार मोठे यक्षप्रश्न, शोधावी लागतील उत्तरे