शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारतीय संघाकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही व इंग्लंडने मालिकेत आघाडी घेतली. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने याने या सामन्यात काही चुका झाल्याचे मान्य केले.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि यजमानांनी श्रेयस अय्यर (६७) च्या अर्धशतकाच्या मदतीने सात बाद १२४ धावा केल्या. इंग्लंडने लक्ष्यचा पाठलाग करताना १५.३ षटकांत २ गडी गमावत आरामात १२५ धावांचे आव्हान पार केले. इंग्लंडने हा सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
सामन्यानंतर विराटने दिली प्रतिक्रिया
पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने बक्षीस वितरण समारंभादरम्यान, सामन्यात झालेल्या चुकांची कबुली दिली. विराट म्हणाला, “या खेळपट्टीवर कसे खेळायला हवे हे आम्हाला समजले नाही. आम्हाला आमचे फटके योग्यरीत्या खेळता आले नाहीत. आणखीही काही अशा गोष्टी आहेत ज्याचे समाधान आम्हाला काढावे लागेल. या सामन्यात झालेल्या चुका सुधारून आम्ही पुढील सामन्यात आणखी उत्साहाने पुनरागमन करू.”
श्रेयस अय्यरचे केले कौतुक
विराटने या सामन्यात भारतातर्फे सर्वाधिक ६७ धावा करणाऱ्या श्रेयस अय्यरचे कौतुक करताना म्हटले, “श्रेयसने दाखवून दिले की या खेळपट्टीचा वापर कसा करावा. उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर त्याने चांगली फलंदाजी केली. आम्ही काही गोष्टी आज करुन पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र, लागलेल्या निकालाचा आम्हाला स्वीकार करावा लागेल.”
भारतीय फलंदाजांचे वाईट प्रदर्शन
या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. केएल राहुल व शिखर धवन हे सलामीवीर अनुक्रमे १ आणि ५ धावा काढून बाद झाले. तर, कर्णधार विराट कोहली खातेही खोलू शकला नाही. यष्टीरक्षक रिषभ पंतदेखील जम बसल्यानंतर खराब फटका खेळून बाद झाला. अष्टपैलू हार्दिक पंड्यानेही १९ धावांवर तंबूचा रस्ता धरला. तळाच्या फळीतील फलंदाजही एकेरी धावसंख्येवर माघारी परतले.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्याच टी२० सामन्यात राडा, भर मैदानात भिडले सुंदर-बेयरस्टो अन्…; पाहा व्हिडिओ
1st T20: इंग्लंडने भारताला पाजले पराभवाचे पाणी, ‘हे’ खेळाडू ठरले टीम इंडियाच्या पराभवाचे खलनायक!