2019 विश्वचषक 30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु होणार आहे. त्यामुळे आता जवळजवळ फक्त एक महिन्याचा कालावधी राहिलेल्या या विश्वचषकासाठी सर्व सहभागी संघांची तयारी सुरु झाली आहे.
या विश्वचषकाआधी शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका ही इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात होणार आहे. पाकिस्तान इंग्लंड विरुद्ध 5 मे ते 19 मे दरम्यान एकमेव टी20 सामना आणि 5 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.
तसेच या मालिकेआधी पाकिस्तान आयर्लंड विरुद्ध 3 मेला एकमेव वनडे सामना खेळणार आहे. त्यामुळे आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तानचा संघ सोमवारी रवाना झाला आहे.
या दौऱ्यासाठी जाण्याआधी पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्याने विश्वचषक 2019 बद्दल आणि भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्याविषयीही मते मांडली आहेत.
तो म्हणाला, ‘आमच्यासाठी साखळी फेरीतील नऊही सामने महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आम्ही प्रत्येक सामना भारताविरुद्ध असल्यासारखा खेळू.’
त्याचबरोबर विश्वचषकात आत्तापर्यंत भारताविरुद्ध झालेल्या सहाही सामन्यात पाकिस्तानला पराभव स्विकारावा लागला असला तरी 2017 ला झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध मिळवलेल्या 180 धावांच्या विजयाने आत्मविश्वास मिळेल, असे देखील सर्फराजने म्हटले आहे.
तो म्हणाला, ‘आम्ही नुकतेच भारताला मोठ्या स्पर्धेत पराभूत केले आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा होईल.’
तसेच या 2019 च्या विश्वचषकासाठी अनेकांनी इंग्लंड आणि भारत हे प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे. पण याबद्दल काळजी वाटत नसल्याचे स्पष्ट करत सर्फराज म्हणाला, ‘जर आम्ही प्रबळ दावेदार म्हणून जाऊ तर समस्या आहे.’
‘पण जर आम्ही अंडरडॉग्स म्हणून जाऊ तर अन्य संघांना आम्ही धोकादायक वाटू. त्यामुळे मला वाटते आम्ही अंडरडॉग्स असणे चांगले आहे. त्यामुळे आमच्यावर दबाव कमी असेल.’
2019 च्या विश्वचषकात सर्व संघ साखळी फेरीत एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. या विश्वचषकातील पाकिस्तानचा पहिला सामना 31 मे ला विंडीज विरुद्ध होणार आहे. तर भारताविरुद्ध 16 जूनला पाकिस्तानचा सामना होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
–आयपीएल २०१९: आजीचे निधन झाल्याने हा खेळाडू खेळणार नाही आजचा सामना
–विश्वचषकाच्या निवडीचा विचार होता डोक्यात, रिषभ पंतचा खुलासा
–तेव्हा धोनी आता पृथ्वी शॉ, जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर मिळाले जीवदान, पहा व्हिडिओ