क्रिकेट प्रेमींच्या प्रतीक्षेचा क्षण अखेर संपला आहे. टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्याचा थरार सुरू झाला आहे. या महामुकाबल्यात प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक (टॉस) जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे. फायनलमध्ये टॉस हरूनही भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव कमालीचा आनंदी दिसला. टॉस झाल्यानंतर आपले विचार मांडताना तो म्हणाला, ‘आम्ही प्रथम फलंदाजी मिळाल्याने आनंदी आहोत. कारण मागील सामन्यांमध्ये आम्ही प्रथम फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली होती. फायनल किंवा सेमीफायनलसारख्या मोठ्या सामन्यांमध्ये स्कोरबोर्डवर चांगली धावसंख्या असणे खूप फायदेशीर ठरते. जुन्या गोष्टी आता इतिहास आहेत. हा नवीन सामना आणि नवीन वर्ल्ड कप आहे, ज्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. टॉसच्या वेळीच स्टेडियम जवळपास पूर्ण भरले आहे. आम्हाला आशा आहे की आम्ही प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन करू. संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.’
दुसरीकडे, टॉस जिंकल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला, ‘आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे. पिच चांगले दिसत आहे. बघूया इथून काही मदत मिळते का. आमचा प्रयत्न असेल की त्यांना कमीत कमी धावसंख्येवर रोखावे, जेणेकरून लक्ष्याचा सहज पाठलाग करता येईल. आमचे सहकारी खेळाडू पूर्णपणे सज्ज आहेत. अशा क्षणांसाठीच आम्ही खेळतो. सेमीफायनलमधील विजयामुळे संघाचा आत्मविश्वास खूप वाढला आहे. मॅकौंकी हा सामना खेळत नाहीये, त्याच्या जागी डफीला संघात स्थान देण्यात आले आहे.’
प्लेइंग इलेव्हन (दोन्ही संघ):
भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड: टिम सायफर्ट (यष्टीरक्षक), फिन ॲलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), जेकब डफी, जिमी नीशम, मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन.






