---Advertisement---

रोखठोक: …तरीही मांजरेकरांचे कौतुक करणं क्रमप्राप्त

---Advertisement---

संजय मांजरेकर यांना समालोचकांच्या पॅनेलमधून नुकतेच वगळण्यात आले. याची बातमी गेले दोन-तीन दिवस भारतासह जगातील अनेक माध्यमांमध्ये येत आहे. सध्या क्रीडा विश्व हे कोरोना व्हायरसमुळे हादरुन गेले आहे. यातच जवळपास सर्वच क्रीडा स्पर्धा एकतर रद्द झाल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. अशात मांजरेकरांचा विषय माध्यमांना आयताच चघळण्यास मिळाला आहे. नाहीतर एक दिवसाच्या वर या विषयावर बातम्याही आल्या नसत्या.

असे असले तरी बऱ्याचशा नेटीझन्सने यावर आनंद व्यक्त केला. कहर तर चेन्नई सुपर किंग्जच्या ट्विटरवरुन झाला आहे. एखाद्या क्रिकेट फॅन्सचे ट्विटर हॅंडल असल्याप्रमाणे या हॅंडलवरुन आनंद साजरा करण्यात आला. या ट्विटवर अनेकांनी अशीच काहीशी उत्तरही दिली. सोशल मिडीयाच्या जमान्यात आता आनंद साजरे करायला नेटीझन्सला असे विषय हवेच असतात.

तरीही मांजरेकरांना या पॅनेलमधून वगळण्याचे कारण समोर येणे या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. भलेही मांजरेकरांचे समालोचन कुणाला आवडो अथवा न आवडो. मांजरेकर हे अतिशय स्पष्टवक्ते समालोचक म्हणून क्रिकेट जगताला माहित आहे. त्यांच्या याच स्पष्टवक्तेपणामुळे अनेक वेळा त्यांना टीकेलाही सामोरे जावे लागते. अगदी भारतीय संघ विजयी झाला तरीही मांजरेकर हे जर काही चुका झाल्या असतील तर त्या दाखविण्यात माहीर समजले जातात.

ज्या काळात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हा कारकिर्दीच्या सर्वोच्च स्थानी होता तेव्हाही हेच मांजरेकर सचिन जिथे चुकला तिथे त्याची चुक दाखविण्यात कमी पडले नाही. रविंद्र जडेजा, विराट कोहली किंवा अगदी हर्षा भोगले यांच्याबद्दलही त्यांनी वेळोवेळी भाष्य केले. जिथं चुक वाटली तिथं नंतर मोकळ्या मनाने माफीही मागितली.

मांजरेकर हे समालोचन करताना जरी ट्रोल झाले असले तरीही ते कधी कुणाची बाजू घेतली म्हणून किंवा कुणावर जाणून बुजून टीका केली म्हणून क्वचितच ट्रोल झाले आहेत. अनेकांनी ज्या-ज्या खेळाडूंना आपला आयडाॅल मानले आहे किंवा जे-जे खेळाडूंचे चाहते आहेत त्यांच्या आवडत्या खेळाडूच्या चुका दाखवल्या म्हणूनच मांजरेकर अनेक वेळा ट्रोल झाले किंवा त्यांना टीकेचा सामना करावा लागला. ज्या काळात समालोचक लोकांच्या लक्षात रहाणे केवळ अशक्य होत चालले आहे त्या काळात हेच मांजरेकर ट्विटरसारख्या माध्यमावर सतत ट्रेंडिंग असतात. त्यांना दुर्लक्षित करुन एखाद्या सामन्याची चर्चा होणे जवळपास अशक्यच.

समालोचक हा कसा असावा याची अनेक उदाहरणं आहेत. यात तो एकाप्रकारे प्रेक्षकांना सामना समजून सांगणारा दुवा असावा. केवळ दृष्य पाहुन प्रेक्षकांना समजेल किंवा ते त्या रस घेतील असे होत नाही. समालोचकाचा रोलच येथे सुरु होतो. चांगली भाषा, त्याचे क्रिकेट खेळाबद्दलचे ज्ञान, वेगवेगळ्या परिस्थितीत बोलण्याची कौशल्य, तसेच कोणताही पुर्वग्रहदुषीत मत व्यक्त न करण्याचा हातखंडा त्याकडे असावाच लागतो. हे गुण मांजरेकरांकडे आहेत का? तर याचं उत्तर त्यांचे विरोधकही नाकारु शकत नाही.

याचमुळे मांजरेकर हे एक वेगळंच रसायन अनेक अर्थांनी ठरतं. एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून मांजरेकरांनी आपला काळही गाजवला. जेवढी मोठी त्यांची क्रिकेटची कारकिर्द ठरली नाही त्याहीपेक्षा मोठा अनुभव त्यांना समालोचनाचा आहे. असं म्हणतात की, मांजरेकर चुक झाली तर स्वत:वर टीका करायलाही मागे पुढे पहात नाही. अगदी मोठी नसली तरी दखल घेता येईल एवढी क्रिकेट कारकिर्द 54 वर्षीय मांजरेकरांची नक्कीच आहे. 37 कसोटी आणि 74 वनडे देशाकडून खेळलेल्या मांजरेकरांनी तब्बल 147 प्रथम श्रेणी व 145 अ दर्जाचे सामने खेळले आहेत.

मग अशा वेळी प्रश्न पडतो की सगळं सुरळीत सुरु असताना माशी नक्की शिंकली कुठे? तर याची अनेक कारण सध्या माध्यमांमध्ये चर्चिली जात आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे कारण जर कोणते सांगतिले जात आहे तर ते सीएए-एनआरसीला विरोध करणे व मुंबईतील आंदोलकांना पाठींबा देणे. तसेच जेएनयुमधील आंदोलकांना पाठींबा दिल्यामुळे तसेच आंदोलकांवर हल्ला झाल्यावर टीका केल्यामुळे ही वेळ ओढवल्याचे कारण दिले जात आहे.

दुसरं कारण म्हणजे धरमशाला वनडेसाठी मांजरेकर धरमशालाला आले नव्हते. त्यामुळे ऐनवेळी काय उपाय योजना करायची? या कारणाने नाखुश असलेल्या बीसीसीआयने त्यांना या पॅनेलमधून वगळल्याचं बोललं जात आहे. रविंद्र जडेजावर केलेली टीकाही त्यांना महागात पडल्याचं बोललं जात आहे. यातील दोनही कारणं अनेक अर्थांनी शुल्लक वाटतात. कारण जर जडेजावर टीका केली होती तर मांजरेकरांवर तेव्हाच कारवाई व्हायला हवी होती. विशेष म्हणजे नंतर चांगली कामगिरी केल्यावर मांजरेकरांनी जडेजाचे तोंडभरुन कौतुकही केले होते. धरमशाला वनडेला उपस्थित राहिले नाही हे कारण यापाठीमागे असण्याची शक्यता जवळपास नाहीच. कारण एखादा मुलगा शाळेत जाणार नसेल तरी वेगवेगळी माध्यमं वापरुन तो ही गोष्ट आजकालच्या जमान्यात शिक्षकांपर्यंत पोहचवतो. याबाबतीत मांजरेकर अतिशय प्रोफेशनल समजले जातात. मग ते येणार नाहीत याची पुर्वकल्पना त्यांनी दिली नसेल असे अजिबात वाटत नाही.

क्रिकेटमध्ये साधारत: दोन प्रकारचे पॅनेल असतात. एक बीसीसीआयचा. त्याला वर्ल्ड फिड असे म्हटले जाते. तर दुसरा पॅनेल असतो तो ब्राॅडकास्टरचा. बीसीसीआयच्या पॅनेलमध्ये सध्या संजय बांगर, हरभजन सिंग, व्हीव्हीएस लक्ष्मण, आकाश चोप्रा, निखील चोप्रा, जतीन सप्रु व इरफान पठाणचा समावेश आहे तर स्टार स्पोर्ट्सच्या ब्राॅडकास्टर पॅनेलमध्ये हर्षा भोगले, संजय मांजरेकर, लक्ष्मण शिवरामाकृष्णन, सुनिल गावसकर व मुरली कार्तिक यांचा समावेश आहे.

समालोचकाने सतत स्पष्ट भूमिका घ्यायची असते. त्याने खेळाडूंना काय वाटेल किंवा अन्य लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नसतो. हे झालं प्रत्यक्ष समालोचन करताना. परंतु जेव्हा हा समालोचक त्याचे वैयक्तिक आयुष्य जगत असतो तेव्हा त्याने कशावर बोलावे? कुठे व्यक्त व्हावे? हा सर्वस्वी त्याचा अधिकार आहे. भारतात सध्या सुरु असलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत भारतातील किती खेळाडूंनी थेट भूमिका घेतल्या? उत्तर नाही असेच येईल. देशाचे प्रतिनीधित्व करताना खेळाडू जेवढे अभिमानाने मिरवतात तेवढेचे देशात काही  योग्य किंवा अयोग्य झाल्यावर मत व्यक्त होताना मात्र मागे हटताना दिसतात. यात माजी खेळाडूही अनेक वेळा मागेच राहिले आहेत. अशा वेळी मांजरेकरांसारखा एखादा स्पष्टवक्ता माजी खेळाडू, समालोचक जेव्हा भूमिका घेतो तेव्हा त्यावर ही कारवाई होणे कितपत योग्य आहे.

खेळ खेळाच्या जागी आणि भुमिका भुमिकेच्या जागी नाही राहु शकतं का? बीसीसीआयला यातून हांजी हांजी करणारे खेळाडू, समालोचक किंवा माजी खेळाडू घडवायचे आहेत का? बीसीसीआयला यातून आमच्या विरुद्ध जालं तर हेच भोगावं लागेल असाच संदेश द्यायचा आहे का? विशेष म्हणजे यात जर सरकारचा हस्तक्षेप वाढणार असेल तर क्रिकेटचं यापेक्षा वाईट दुर्दैव काहीच नसेल.

एवढ सगळं झाल्यावरही मांजरेकरांनी मागे पुढे न पहाता आपण किती प्रोफेशनल आहोत हे पुन्हा एकदा दाखवुन दिले. त्यांना वगळल्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मी समालोचन करणे सतत माझं भाग्य समजत आलो आहे. मी कधीही हा माझा हक्क आहे असं म्हटलो नाही. मला माझ्या नोकरीवर कायम ठेवायचं की नाही हा पुर्णपणे मला नोकरी देणाऱ्यांचा अधिकार आहे. आणि मी त्या निर्णय़ाचा सन्मानचं करतो. बीसीसीआय माझ्या कामगिरीवर नाखुश असेल. आणि मी अतिशय व्यावहारिकदृष्ट्या याचा स्विकार करत आहे.” असे त्यांनी दोन दिवसांपुर्वी केलेले ट्विट होते. आणि येथेच मांजरेकर हे अनेक आजी-माजी खेळाडू व समालोचकांपेक्षा वेगळे ठरले.

एका क्रिकेटरची गोष्ट लेखमालेतील निवडक लेख-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच

गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---