वेस्ट इंडीज दौऱ्यात विराट कोहलीला वगळल्यानंतर चाहते चांगलेच संतापले आहेत. विराटला वारंवार मिळणाऱ्या विश्रांतीमुळे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी बीसीसीआयने गुरुवारी (१४ जुलै) टी-२० संघाची घोषणा केली, ज्यामध्ये विराटचे नाव नव्हते. अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, वेस्ट इंडीज दौऱ्यातून विराटने स्वतःहून विश्रांती घेतली आहे की, त्याला संघ व्यवस्थापनाने खाली बसवले आहे. आता चाहत्यांच्या या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.
विराट कोहली (Virat Kohli) वेस्ट इंडीज दौऱ्यात सहभागी नसल्याचे समजल्यानंतर बीसीसीआयने याविषयी कसलीही अधिकची माहिती दिली नाहीये. परंतु माध्यमांतील वृत्तानुसार, विराटने स्वतः विश्रांतीसाठी मागणी केली होती. संघ निवडला जाण्याच्या आधीही अशा बातम्या समोर आल्या होत्या की, विराट आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना विश्रांती हवी आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार विराटला एकट्याला विश्रांती दिली गेली आहे, तर बुमराहला मात्र वर्कलोड मॅनेजमेंटसाठी संघातून बाहेर ठेवले गेले आहे.