भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टी २० मालिकेत खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना १ जुलैला खेळला गेला, ज्याचा निकाल पावसामुळे लागला नाही. या सामन्यात श्रेयसने अर्धशतकी खेळी केली आणि विशेष विक्रमाची नोंद केली.
श्रेयसने ४७ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि १ षटकारासह ६८ धावा केल्या. त्याचबरोबर तो टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा सातवा भारतीय कर्णधार ठरला. त्याच्याआधी सुरेश रैना, रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल, केएल राहुल, सूर्यकुमार यादव यांनी भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व करताना अर्धशतके केली आहेत.
अर्धशतक केल्याने श्रेयसने सात भारतीय कर्णधारांना मागे टाकले आहे. यामध्ये एमएस धोनी आणि हार्दिक पंड्या यांचाही समावेश आहे. तसे पाहिले तर एकूण १५ खेळाडूंनी भारताच्या टी २० संघाचे कर्णधारपद भुषवले आहे. त्यापैकी १४ फलंदाज आणि एक गोलंदाज आहे.
त्या १४ फलंदाजांपैकी केवळ सात जणांनी आपल्या नेतृत्वाच्या काळात अर्धशतके केली आहेत, मात्र सात कर्णधार असे आहेत की ज्यांनी आपल्या नेतृत्वाच्या काळात एकदाही टी २० मध्ये अर्धशतकी खेळी केली नाही. या यादीत वीरेंद्र सेहवाग, एमएस धोनी, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या आणि ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे.
सेहवागने केवळ एका सामन्यात, रहाणेने दोन सामन्यांमध्ये, धवनने तीन आणि पंतने पाच सामन्यांमध्ये भारताच्या टी २० संघाचे नेतृत्व केले होते. ऋतुराजने तीन सामन्यांमध्ये नेतृत्व केले होते, मात्र त्याला एकाही सामन्यात अर्धशतक झळकावता आले नाही.
धोनीने ७२ सामन्यांमध्ये आणि हार्दिकने १६ सामन्यांमध्ये भारतीय टी २० संघाचे नेतृत्व केले, मात्र एकही अर्धशतकी खेळी केली नाही. आता श्रेयसने इंग्लंड दौऱ्यातील आपल्या नेतृत्वाच्या तिसऱ्याच सामन्यात अर्धशतकी खेळी केली आणि या सात माजी कर्णधारांना मागे टाकले. (As India T20I Captain Scored Fifty)
भारताचा टी २० कर्णधार बनलेला एकमेव गोलंदाज
भारताच्या टी २० संघाचे नेतृत्व करणारा जसप्रीत बुमराह हा एकमेव गोलंदाज आहे. त्याने २०२३ मध्ये दोन सामन्यांमध्ये कर्णधारपद सांभाळले होते आणि हे दोन्ही सामने भारताने जिंकले होते.






