---Advertisement---

“आम्ही २०११ चा विश्वचषक जिंकून कोणावर उपकार केले नाहीत”, गौतम गंभीरचे खळबळजनक भाष्य

On: गुरूवार, एप्रिल 1, 2021 10:21 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेटप्रमींसाठी २०११ विश्वचषक अविस्मरणीय ठरला आहे. हा विश्वचषक भारतीय संघाने जिंकला होता. या विजेतेपदाला यंदा २ एप्रिलला १० वर्षे पूर्ण होत आहे. हा विश्वचषक भारताला जिंकून देण्यात गौतम गंभीरने मोलाचा वाटा उचलला होता. मात्र, आता १० वर्षांनंतर गंभीरने मोठे भाष्य केले आहे.

गंभीरने म्हटले आहे की आता वेळ आली आहे की या विश्वचषकाला विसरुन पुढे जायला हवे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत गंभीरने म्हणाला, ‘ही गोष्ट कालच घडली आहे, असे वाटत नाही. कमीत कमी मला तरी असं वाटत नाही. आता या गोष्टीला १० वर्षे होऊन गेले आहेत. मी असा व्यक्ती नाही जो फार जास्त मागे वळून पाहातो. नक्कीच विश्वचषक विजयाचा क्षण अभिमानाचा होता. पण आता भारतीय क्रिकेटला पुढे जाण्याची वेळ आली आहे. कदाचीत आता वेळ आली आहे की आपण लवकरात लवकर पुढील विश्वचषक जिंकायला हवा.’

तसेच गंभीर म्हणाला, ‘२०११ साली आम्ही असे काहीही केले नाही जे आपण करू नये. त्यावेळी विश्वचषक जिंकण्यासाठी आम्हाला निवडण्यात आले होते आणि आम्ही विश्वचषक जिंकणे अपेक्षित होते. आमची निवड केवळ स्पर्धेत खेळण्यासाठीच नव्हती, तर आम्ही जिंकण्यासाठी उतरलो होतो. पण आता माझ्या मतानुसार अशी भावना उरलेली नाही. आम्ही कोणतेही अनन्यसाधारण गोष्ट केलेली नाही. हो नक्कीच आम्ही देशाचा सन्मान वाढवला, लोक आनंदी होते. पण आता पुढचा विश्वचषक जिंकण्यावर लक्ष द्यायची वेळ आहे.’

साल २०११ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताला २७५ धावांचा आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग  करताना वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर लवकर बाद झाले. पण नंतर आलेल्या गौतम गंभीरने ९७ धावांची खेळी करत भारताला विजयापर्यंत पोहोचवले होते. त्याने पाचव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या धोनीबरोबर १०९ धावांची भागीदारी केली होती. धोनीने नंतर नाबाद ९१ धावा करत भारताला विजय मिळवून दिला होता.

गंभीरने पुुढे म्हटले आहे की भारताने आता भूतकाळात रमू नये. तो म्हणाला, ‘जर आपण २०१५ आणि २०१९ सालचा विश्वचषक जिंकू शकलो असतो तर भारत जागतिक क्रिकेटमध्ये सुपर पॉवर असला असता. १० वर्षांपासून आपण दुसरा विश्वचषक जिंकू शकलेलो नाही. म्हणूनच मी भूतकाळातील यशाने जास्त उत्सुक होत नाही.’

सध्या दिल्लीचा खासदार असलेल्या गंभीरने पुढे म्हटले, ‘जर मी ९७ धावा केल्या, तर मला या धावा करण्यासाठीच निवडण्यात आले होते. झहिर खानचे काम विकेट घेणे होते. आम्ही २ एप्रिलला जे केले त्यातून कोणावर उपकार केले नाहीत. मला माहित नाही की लोक भूतकाळात जाऊन १९८३ आणि २०११ च्या क्षणांनाच का पाहातात. नक्कीच याबद्दल चर्चा करायला छान वाटते. पण सारखं मागे पाहाण्यापेक्षा पुढे जाणे नेहमीच चांगले असते.’

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल २०२१ पूर्वी ‘या’ दोन संघांना आपला कर्णधार बदलण्याची आहे गरज

IPL 2021: ‘या’ कारणांमुळे मुंबई इंडियन्स सलग तिसऱ्यांदा आयपीएल विजेता होण्यात ठरु शकतो अपयशी

राजस्थान रॉयल्सच्या राहुल तेवातियाचा हॉटेल रूममधील व्हिडीओ व्हायरल; कॅमेरा चालू असल्याची नव्हती कल्पना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---