विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ जेतेपद मिळवण्यासाठी एकमेकांशी दोन हात करतील. या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने २० सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात दिग्गज खेळाडूंना संधी दिली गेली आहे, जे कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याद्वारे पुनरागमन करु शकतात. या मोठ्या सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उद्भवत असतील की, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोणत्या खेळाडूंना स्थान मिळेल?
तसेच अनुभवी खेळाडूंसह युवा खेळाडू देखील चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत, हे त्यांनी गेल्या काही सामन्यांमध्ये दाखवून दिले आहे. परंतु अनुभवी खेळाडू पुनरागमन करत असल्यामुळे काही युवा खेळाडूंना त्यांचे स्थान गमवावे लागेल का? तसेच काही प्रतिभाशाली युवा धुरंधरांमुळे वरिष्ठांना बाकावर बसावे लागेल का? येथे आम्ही कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी न मिळू शकणाऱ्या काही खेळाडूंचा आढावा घेतला आहे.
चला तर पाहूया, असे ३ खेळाडू ज्यांनी चांगली कामगिरी केलेली असतानाही त्यांना कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे कठीण दिसत आहे.
१) उमेश यादव : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने भारतीय संघासाठी अनेकदा मोलाची भूमिका बजावली आहे. परंतु विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांची तिकडी असताना उमेश यादवला संघाबाहेर राहावे लागु शकते. तिघांनीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झालेल्या कसोटी मालिकेतून माघार घेतली होती. त्यामुळे या सामन्यात हे तिघेही जोरदार पुनरागमन करण्याच्या प्रतिक्षेत असणार आहेत.
२) वॉशिंग्टन सुंदर : भारतीय संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये एक अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत त्याने ८५ आणि ९६ धावांची खेळी केली होती. वॉशिंग्टन सुंदरला रवींद्र जडेजा ऐवजी संघात स्थान देण्यात आले होते. परंतु आता जडेजा संघात पुनरागमन करत असल्यामुळे सुंदरला संघात जागा मिळणे कठीण आहे.
३) अक्षर पटेल : आपल्या कसोटी पदार्पणाच्या मालिकेत तब्बल २७ गडी बाद करणारा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याने भारतीय संघासाठी इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. परंतु संघात अष्टपैलू रवींद्र जडेजाचे पुनरागमन झाल्यामुळे अक्षर पटेलचे स्थानदेखील धोक्यात येऊ शकते. जडेजा आणि अश्विन यांची फिरकी जोडी कुठल्याही फलंदाजी क्रमाला उद्ध्वस्त करू शकते. गोलंदाजीसह दोघेही उत्कृष्ट फलंदाज देखील आहेत. त्यामुळे अक्षर पटेलला अंतिम एकादशमध्ये स्थान मिळणे कठीण आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचा श्रीलंका दौरा रद्द होण्याच्या मार्गावर, ‘या’ मोठ्या कारणामुळे आयोजन धोक्यात?
तो कधीही जिंकता सामना खेचून घेऊ शकतो; भारताच्या ‘या’ धुरंधराची इंग्लिश दिग्गजाला वाटते भिती
‘भारतीय महिला संघातील घमेंडीपणा..,’ प्रशिक्षकपदावरुन सुट्टी झालेल्या रमण यांचे गांगुली-द्रविडला पत्र