क्रिकेट जगतातील सर्वोत्कृष्ट संघांच्या यादीत भारतीय क्रिकेट संघाची गणना होते. या संघात उच्च दर्जाच्या खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे संघात स्थान मिळवण्यासाठी बरीच स्पर्धा असते. संघात निवड होण्यासाठी खेळाडूंना सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करावी लागते.
काही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले आहे. मात्र फार कमी कालावधीसाठी ते भारतीय संघात स्थान टिकवून ठेऊ शकले.
या लेखात आपण अशा तीन भारतीय खेळाडूंची माहिती पाहाणार आहोत ज्यांना उत्तम कामगिरीनंतरही भारतीय संघात परत स्थान मिळू शकले नाही.
1. मुरली कार्तिक
भारताचा माजी फिरकीपटू मुरली कार्तिकने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 644 बळी घेतले आहेत. पण भारतीय राष्ट्रीय संघाकडून तो केवळ 8 कसोटी, 37 वनडे आणि 1 टी20 सामना खेळला आहे.
मुरली कार्तिकने सन 2000 मध्ये कसोटी सामन्यात पदार्पण केले होते, परंतु त्यावेळी अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग भारतीय क्रिकेटमध्ये आघाडीचे फिरकीपटू होते. भारतीय संघाकडून खेळताना ही जोडी जबरदस्त कामगिरी करत होती.
या दोन यशस्वी फिरकीपटूंमुळेच मुरली कार्तिकला भारतीय संघाकडून खेळण्याची अधिक संधी मिळाली नाही. त्याने 2004 मध्ये भारतीय संघाकडून अखेरचा कसोटी खेळाला होता, तर सन 2007 मध्ये वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तथापि कार्तिक एक जबरदस्त गोलंदाज होता आणि स्वतःच्या बळावर सामना जिंकवून देण्याची क्षमता त्याच्याकडे होती.
2. मनोज तिवारी
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 50.36 च्या सरासरीने धावा करणाऱ्या मनोज तिवारीला भारतीय संघाकडून खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही. भारतीय संघात निवड होऊनही त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. सन 2008 मध्ये पदार्पण करणाऱ्या मनोज तिवारीला भारतीय संघात आपले स्थान टिकवून ठेवता आले नाही.
मनोज तिवारी भारताकडून 12 वनडे आणि 3 टी20 सामने खेळला आहे. वनडे सामन्यात त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध शतकही नोंदवले आहे. एवढेच नव्हे, तर तो एक उत्तम क्षेत्ररक्षकही होता.
3. इरफान पठाण
इरफान पठाण हा भारतातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होता. तो स्विंग गोलंदाजीसाठी लोकप्रिय होता. याशिवाय कराची येथे झालेल्या कसोटी सामन्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. अनेक प्रसंगी त्याने त्याच्या फलंदाजीच्या जोरावरही संघाला विजय मिळवून दिला आहे.
इरफान पठाणने आपल्या कारकिर्दीत भारतीय संघाकडून 29 कसोटी, 120 वनडे आणि 24 टी -20 सामने खेळले. यामध्ये त्याने कसोटीत 100, वनडेत सामन्यात 173 आणि टी20 मध्ये 28 बळी घेतले आहेत. मात्र काही सामन्यांमध्ये केलेल्या खराब कामगिरीमुळे त्याला संघात स्थान मिळू शकले नाही.
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘विराट’सेना नेहमीच ठरली वरचढ, पाहा आकडेवारी
सातत्याला सलाम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक सरासरीने धावा करणारे ३ भारतीय धडाकेबाज फलंदाज
ऑस्ट्रेलियन फलंदाजांना ‘सळो की पळो’ करून सोडणारे ३ भारतीय गोलंदाज
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! रोहित आणि ईशांत शर्मा पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यातून बाहेर?
टीम इंडियाचे ४ माजी खेळाडू श्रीलंकेतील LPL स्पर्धेत गाजवणार मैदान; ‘या’ संघात समावेश