कोणत्याही राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणे सोपे काम नाही. कर्णधारपद ही सर्वात मोठी जबाबदारी असते. आपल्याबरोबर अन्य १० खेळाडूंसह संघाला पुढे न्यायचे असते. कर्णधारपद मिळणे सन्मानाचे असले तरी ते एकप्रकारचे काटेरी मुकुट असते. कारण संघाच्या प्रत्येक हार-जीतसाठी कर्णधाराला जबाबदार धरले जाते. संघाने चांगली कामगिरी केली, तर कर्णधाराची वाहवा होते. तसेच जर संघाला वाईट पराभव स्विकारावा लागला, तरी टिकेचा धनी कर्णधाराला व्हावे लागते.
पण असे असतानाही आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक कर्णधार झाले आहेत, ज्यांनी यशाची नवनवी शिखरे गाठली आहेत. पण असेही काही कर्णधार झाले ज्यांना फारसे यश मिळाले नाही.
प्रत्येक चांगला खेळाडू हा चांगले नेतृत्व करुच शकतो असे नसते. अनेकदा त्या खेळाडूमध्ये नेतृत्व कौशल्यही असणे आवश्यक असते. या लेखात आपण अशा ३ क्रिकेटपटूंबद्दल आढावा घेणार आहोत, ज्यांनी एक खेळाडू म्हणून मोठे नाव कमावले, मात्र कर्णधार म्हणून ते अयशस्वी ठरले.
खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारे पण कर्णधार म्हणून अयशस्वी ठरलेले ३ क्रिकेटपटू –
३. ख्रिस गेल –
वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने अनेकदा मोठ्या आणि तुफानी खेळी करत अनेकांना चकित केले आहे. त्याने कसोटीत त्रिशतक, वनडेत द्विशतक, टी२०मध्ये दिडशतक अशा मोठ्या खेळीही करत विक्रम रचले. तो एक सलामीवीर फलंदाज म्हणून यशस्वी ठरला. मात्र कर्णधार म्हणून त्याला तेवढे यश मिळाले नाही.
गेलने वेस्ट इंडिजचे वनडेमध्ये ५३ सामन्यात नेतृत्व केले, त्यातील केवळ १७ सामन्यात वेस्ट इंडिजला यश आले तर ३० सामन्यात वेस्ट इंडिज संघ पराभूत झाला. तसेच कसोटीमध्ये २० सामन्यात गेलने नेतृत्व केले. त्यातील केवळ ३ सामन्यात त्याला विजय मिळवता आला. तर ९ सामन्यात वेस्ट इंडिजने पराभव स्विकारला आणि ८ सामने अनिर्णित राहिले.
टी२० मध्ये त्याने वेस्ट इंडिजचे १७ सामन्यांमध्ये नेतृत्व केले. त्यातील केवळ ६ सामन्यात वेस्ट इंडिजला विजय मिळवता आला आणि १० सामन्यात पराभव स्विकारावा लागला.
गेलला कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करता न आल्याने त्याला कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आले. त्याच्याऐवजी रामनरेश सरवानला कर्णधार करण्यात आले होते.
२. अझर अली –
पाकिस्तानचा अनुभवी क्रिकेटपटू अझर अलीने अनेकदा पाकिस्तान संघासाठी चांगली कामगिरी केली. त्याने पाकिस्तानकडून ७ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. तसेच कसोटीत त्रिशतकही केले आहे. मात्र कर्णधार म्हणून त्याची कामगिरी खास राहिली नाही.
२०१५ ला त्याला शाहिद आफ्रिदीच्या निवृत्तीनंतर कर्णधारपद देण्यात आले होते. त्याने ३१ वनडे सामन्यांमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले. पण केवळ १२ सामन्यात विजय मिळवता आला. तर १८ सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला. त्यानंतर २०१७ ला त्याने कर्णधारपद सोडले. २०१८ ला त्याने वनडेतून निवृत्तीही घेतली. सध्या तो कसोटी संघातून नियमित खेळतो.
तसेच नुकतेच काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने त्याला कसोटी संघाचे नेतृत्वाची जबाबदारीही दिली आहे. त्याने आत्तापर्यंत ६ कसोटी सामन्यात पाकिस्तानचे नेतृत्व करताना २ सामन्यात विजय मिळवला आहे आणि ३ सामन्यात पराभव पत्करला आहे. तसेच १ सामना अनिर्णित राहिला.
१. सचिन तेंडुलकर –
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खेळाडू म्हणून अनेक मोठे विश्वविक्रम केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके करण्याचा पराक्रमही केवळ सचिनला करता आला आहे. एवढेच नाही तर तो सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज आहे. मात्र कर्णधार म्हणून सचिनची कारकिर्द तितकी बहरली नाही. सचिनने १९९६ ते २००० दरम्यान भारताचा कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
सचिनने ७३ वनडे सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले पण त्याला यातील केवळ २३ सामनेच भारतीय संघाला जिंकता आले. तर ४३ सामन्यात पराभवाचा स्विकार करावा लागला. तसेच १ सामना बरोबरीत सुटला.
तसेच सचिनने कसोटीत २५ सामन्यात नेतृत्व केले. त्यातील ४ सामन्यात भारताला विजय मिळवता आला. तर ९ सामन्यात पराभव स्विकारावा लागला आणि १२ सामने अनिर्णित राहिले.
एवढेच नाही तर कर्णधार असताना सचिन धावा करतानाही संघर्ष करताना दिसला. त्याने नेतृत्व केलेल्या ९८ आंतरराष्ट्रीय सामन्यात ४५०८ धावा केल्या होत्या. कर्णधार म्हणून त्याच्या योग्यतेवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत असल्याने अखेर सचिनने कर्णधारपदाचा राजीनामा दिला.
वाचनीय लेख –
टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्षपद सांभाळू शकतात हे ३ खेळाडू
धोनीवर लावला जातो या पाच खेळाडूंचे करियर संपविल्याचा आरोप
ते चार खेळाडू ज्यांना डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षा उत्तम फलंदाज म्हटले जात