भारतीय संघात अनेक अष्टपैलू खेळाडू होऊन गेले. तसेच आताही आहेत. यापैकीच एक म्हणजे युवराज सिंग. युवराजने २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ वनडे विश्वचषकात भारतीय संघाकडून खेळताना मोलाचे योगदान दिले. त्याने ३ ऑक्टोबर २०००मध्ये केनियाविरुद्ध खेळताना वनडे पदार्पण केले होते. त्याने आपल्या वनडे कारकीर्दीत एकूण १४ शतके ठोकली आहेत. तर ५२ अर्धशतकांचाही यामध्ये समावेश आहे.
असे असले तरीही युवराजबद्दल (Yuvraj Singh) एक गोष्ट ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याला आपले पहिले शतक करण्यासाठी ३ वर्षे आणि ७० सामन्यांची (3 Years & 70 ODI Matches Wait) वाट पहावी लागली होती.
ढाका येथे २००३मध्ये भारत, बांंगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या संघात तिरंगी मालिका झाली होती. यातील बांगलादेश विरुद्ध भारताच्या पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) संघाला चांगली सुरुवात दिली होती. यानंतर युवराज फलंदाजीला आला, त्यावेळी भारताची धावसंख्या २६.१ षटकात ३ बाद १३२ धावा इतकी होती.
युवराज फलंदाजी आल्यानंतर त्याने एक बाजू सांभाळली. परंतु लवकरच भारताची धावसंख्या ६ बाद १७२ धावा झाली. यानंतर त्याला अजित आगरकरची साथ मिळाली. त्यावेळी युवराज आणि आगरकर यांच्यात ९२ धावांची भागीदारी झाली. या भागीदारीत आगरकरने फक्त २० धावा केल्या होत्या.
युवराजने या सामन्यात ८५ चेंडूत नाबाद सर्वाधिक १०२ धावा केल्या होत्या. यामध्ये ४ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश होता. त्याने १०२ धावांची शतकी खेळी करत आपल्या वनडे आणि आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिले शतक ठोकले. युवराजने हे शतक ७१ व्या वनडे सामन्यात केले होते. तरीही भारतीय संघाला पूर्ण ५० षटके फलंदाजी करता आली नाही. भारताचा डाव ४९.३ षटकात २७६ धावांमध्ये संपुष्टात आला होता.
भारताच्या भल्या मोठ्या २७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश (Bangladesh) संघ केवळ २७.३ षटकात ७६ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारतीय संघाने या सामन्यात २०० धावांच्या मोठ्या संख्येने विजय मिळविला होता. यावेळी बांगलादेशकडून खेळताना केवळ मोहम्मद रफीकने सर्वाधिक १८ धावा केल्या होत्या.
भारताकडून गोलंदाजी करताना झहीर खानने (Zahir Khan) सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या. तर अजित आगरकरने (Ajit Agarkar) ३ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच अविष्कार साळवी (Aavishkar Salvi) आणि हरभजन सिंगने (Harbhajan Singh) अनुक्रमे २ आणि १ विकेट्स घेतल्या.
या सामन्यात युवराजला त्याच्या शतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
-ट्रेंडिंग घडामोडी
-गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
-चहल म्हणतोय, हे ३ गुण असलेल्या मुलीशीच मी करणार लग्न
-क्रिकेट सोडून भारताचा स्टार क्रिकेटपटू झालाय कराटे प्लेअर
-शेवटचे २ पर्याय, आयपीएलच्या आयोजनासाठी बीसीसीआयकडे केवळ हे पर्याय