---Advertisement---

आनंदाचा क्षण! विजयानंतर रोहितने विराटला उचलले खांद्यावर, पंड्यालाही अश्रू अनावर

On: रविवार, ऑक्टोबर 23, 2022 7:46 PM
Virat-Kohli-And-Rohit-Sharma
---Advertisement---

भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2022मध्ये पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 4 विकेट्सने शानदार विजय मिळवला. तसेच, भारतीयांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरले. या सामन्यात एक वेळ अशी होती की, हा सामना भारताच्या हातातून निसटला असे वाटत होते. मात्र, विराट कोहली हा बुरुजासारखा भक्कमरीत्या शेवटपर्यंत उभा राहिला आणि भारताला विजयी करूनच शांत झाला. यासह त्याने दाखवून दिले की, त्याला ‘किंग कोहली’ का म्हणतात. विशेष म्हणजे, या विजयानंतर तो भावूकही झाला. त्याला कर्णधाराने उचलून घेतले. यादरम्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

रोहितने खांद्यावर घेतले उचलून, पंड्याही रडला
संंघाला विजय मिळवून दिल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानावर आला आणि त्याने विराटला आपल्या खांद्यावर उचलून घेतले. तसेच, त्याने त्याला फिरवलेदेखील. विराट आणि संघाच्या इतर खेळाडूंचा आनंद यावेळी गगनात मावेनासा झाला. सामना संपल्यानंतर पंड्या जेव्हा एँकर इरफान पठाण याच्यासोबत बोलत होता, तेव्हा त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू निघू लागले. तो म्हणाला की, “आम्ही फक्त या प्रेमापोटी आणि सन्मानासाठी खेळतो. आमच्यासाठी चाहत्यांचा आनंद सर्वप्रथम आहे.” तो पुढे असेही म्हणाला की, “आम्ही पुढे ही लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करू.”

https://twitter.com/ImTanujSingh/status/1584156553925382145

‘माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी’
विराटने सांगितले की, “जेव्हा शेवटच्या षटकात टार्गेट मोठे होते, तेव्हा मी फक्त हाच विचार करत होतो की, चेंडूवर लक्ष द्यायचे आहे. फक्त दोन चेंडूंवर दोन षटकार झाले, तेव्हा विरोधी संघ पॅनिक झाला.” विराटने पुढे सांगितले की, “मी मोहालीमध्ये खेळलेल्या माझ्या खेळीला सर्वोत्तम मानायचो, पण या सामन्यात जी परिस्थिती निर्माण झाली, त्यानंतर मी या खेळीलाही माझी सर्वोत्तम खेळी मानतो.” यानंतर विराटने संपूर्ण भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला की, “जेव्हा तुम्ही अशाप्रकारे विजय मिळवता, तेव्हा तुमचा आनंद द्विगुणीत होतो आणि आम्हाला हे कायम राखण्याची खूप गरज आहे.”

शेवटपर्यंत क्रीझवर टिकला विराट
विराट कोहली (Virat Kohli) क्रीझवर उभा राहिला आणि त्याने हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्यासोबत पाचव्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी रचली. मात्र, यानंतर पंड्या 40 धावांवर बाद झाला. त्यानंतर असे वाटले की, सामना हातातून निसटला, पण विराट अजूनही क्रीझवर होता. इतकेच नाही, तर शेवटच्या षटकात भारतीय संघाची नशिबानेही साथ दिली आणि शेवटी भारताने हा सामना 4 विकेट्सने आपल्या नावावर केला. विराटने या सामन्यात 53 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 82 धावा चोपल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान भिडतो तेव्हा कोहलीच नडतो! पाच विश्वचषकात एकट्या विराटने लढवलाय किल्ला
राष्ट्रगीतावेळी रोहित झाला भावूक, पाकिस्तानविरुद्ध मैदानात उभा असताना डोळे बंद करून रडला कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---