भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी(१९ जानेवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन येथील द गॅबा क्रिकेट स्टेडियमवर ३ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबरच ४ सामन्यांची कसोटी मालिका भारताने २-१ अशा फरकाने जिंकली. या मालिकेत पहिल्या सामन्यात भारताला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांनतर विराट पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला. त्यामुळे उर्वरित ३ सामन्यांसाठी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी अजिंक्य राहणेवर आली. त्याने ही जबाबदारी समर्थपणे सांभाळताना भारतीय संघाला मालिकेत पुनरागमन करुन दिले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २ विजय मिळवत मालिका जिंकली.
याबरोबरच रहाणे आता ऑस्ट्रेलियामध्ये २ कसोटी सामने जिंकणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी असा पराक्रम विराट कोहली आणि बिशनसिंग बेदी यांनाच करता आला आहे. तसेच सौरव गांगुली, अनिल कुंबळे आणि सुनिल गावसकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रत्येकी १ सामना ऑस्ट्रेलियामध्ये जिंकला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विजय मिळवणारे भारतीय कर्णधार –
१. अजिंक्य रहाणे (२ कसोटी विजय) –
रहाणेने ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच कसोटीत नेतृत्व केले होते. पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वीही ठरला. विराट मायदेशी परतल्याने अजिंक्यवर नेतृत्वाची धूरा सोपवण्यात आली. त्याने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा नेतृत्व केलेल्या मेलबर्न कसोटीत भारताने ८ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात त्याने केलेली शतकी खेळी फार महत्त्वाची ठरली. त्यानंतर सिडनी येथे त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला सामना अनिर्णित राखण्यात यश आले. तर ब्रिस्बेन कसोटीत भारताने ३ विकेट्सने विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिका ऑस्ट्रेलियन भूमीत जिंकण्याची करामत केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये मालिका विजय मिळवणाराही रहाणे विराट नंतरचा दुसरा भारतीय कर्णधार ठरला.
२. विराट कोहली (२ कसोटी विजय) –
२०१४-२०१५मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामने खेळले, यातील पहिल्या व चौथ्या कसोटीत विराटने संघाचे नेतृत्त्व केले. यातील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. तर चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर २०१८-१९मध्ये विराटच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ परत ऑस्ट्रेलियाला ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी गेला. यातील पहिला व तिसरा सामना भारताने जिंकला तर दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. त्यावेळी भारताने विराटच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली होती.
३. बिशनसिंग बेदी (२ कसोटी विजय)
बिशनसिंग बेदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने साल १९७७-७८मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये ५ कसोटी सामने खेळले. यातील तिसऱ्या व चौथ्या कसोटीत भारताने शानदार विजय मिळवले. परंतु बाकी ३ कसोटीत पराभवामुळे मालिका ३-२ अशी पराभूत झाले. बेदी हे ऑस्ट्रेलियात २ कसोटी सामने जिंकणारे पहिले भारतीय कर्णधार आहेत.
४. सुनिल गावसकर (१ कसोटी विजय)
सुनिल गावसकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी साल १९८१ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. यात पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर तिसरा सामना भारताने जिंकला. दुसरा सामना अनिर्णित राहिला.
५. सौरव गांगुुली (१ कसोटी विजय)
सन २००३-०४मध्ये गांगुलीच्या नेतृत्त्वाखाली भारताने ४ कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. यात भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी राखली. यातील पहिला व चौथा सामना अनिर्णित राहिला तर दुसऱ्या सामन्यात भारताने आणि तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.
६. अनिल कुंबळे (१ कसोटी विजय)
साल २००७-०८ ला भारतीय संघाने अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. तर तिसरा सामना पर्थ येथे भारताने जिंकला होता. तसेच ऍडलेड येथे झालेला चौथा सामना अनिर्णित राहला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
“ब्रिस्बेन कसोटी सामन्यावर चित्रपट बनवा”, या बॉलिवूड अभिनेत्याने केली मागणी
हरभजन सिंगचा CSK सोबतचा प्रवास संपला, भावनिक ट्विट करत दिली माहिती