इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ट्रेंट ब्रिजवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. त्यामुळे भारतीय संघ सामन्यात चांगल्या स्थितीत होता. असे असले तरी, पाचव्या दिवशीच्या पावसामुळे एकही चेंडू खेळवण्यात आला नाही. त्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला. या सामन्याचा निकाल जरी लागला नसला तरी, इंग्लंडचा कर्णधार जो रूटला पहिल्या डावातील अर्धशतकीय आणि दुसऱ्या डावातील शतकीय खेळीमुळे सामनावीर खेळाडू म्हणून निवडले.
मात्र, भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्राचे याबाबत जरा वेगळे मत होते. सामन्यातील पहिल्या डावात ४ तर, दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला हा सामनावीराचा पुरस्कार मिळायला हवे होते, असे तो म्हणाला.
याबाबत बोलताना तो म्हणाला, ‘माझ्या मते हा पुरस्कार बुमराहला मिळायला हवा होता. कारण, जेव्हा तुम्ही नाकेफेक हरल्यानंतर गोलंदाजीसाठी येता, तेव्हा चांगली सुरूवात करणे खूप गरजेचे असते. त्याने दोन्ही डावात उत्कृष्ट कामगिरी करत पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या. याचाच परिणाम की, भारत चौथ्या दिवसापर्यंत चांगल्या स्थितीत होता.’
तसेच बुमराहने केवळ गोलंदाजीतच नव्हे, तर फलंदाजीत देखील कमाल दाखवली होती. त्याने पहिल्या डावात तळातल्या फळीत फलंदाजी करताना २८ धावा करत भारताच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. त्यामुळे भारतीय संघाला ९५ धावांची आघाडी मिळाली होती. तसेच दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या. हे पाहता बुमराहलाच हा सामनावीराचा पुरस्कार मिळायला हवा होता. असेही तो म्हणाला.
दरम्यान, पाचव्या दिवसापर्यंत भारतीय संघ या सामन्यात आघाडीवर होता. पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला १८३ धावांत रोखल्यानंतर याच्या उत्तरादाखल भारतीय संघ फलंदाजीला उतरल्यानंतर केएल राहुल आणि रविंद्र जडेजाच्या अर्धशतकीय खेळीमुळे भारतीय संघाने २७८ धावा करत ९५ धावांची आघाडी मिळवली होती.
त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या १०९ धावांच्या शतकीय खेळीच्या जोरावर इंग्लंडने ३०३ धावा करत भारतासमोर २०९ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यानंतर चौथ्या दिवसाअखेर भारताची स्थिती १ बाद ५२ अशी होती. भारताला जिंकण्यासाठी केवळ १५७ धावांची गरज होती. मात्र पाचव्या दिवशी पूर्ण दिवस पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पाचव्या दिवशी एकही चेंडू न खेळवता सामना अनिर्णीत राहिला.
महत्वाच्या बातम्या –
–पहिला कसोटी अनिर्णीत सुटला, पण विराट आणि रहाणेच्या चिंतेत झाली वाढ; ‘हे’ आहे प्रमुख कारण
–अँडरसनने कोहलीला ‘गोल्डन डक’ वर बाद केल्याचे पाहून दिग्गज इंग्लिश खेळाडूला झाला भलताच आनंद; म्हणाला…