भारतीय संघ नाणेफेक गमावत आशिया चषक 2023 सुपर- 4 फेरीच्या चौथ्या सामन्यात फलंदाजीला उतरला होता. यावेळी भारताने फक्त 2 विकेट्स गमावल्या. भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतक झळकावले, तर त्यानंतर फलंदाजीला उतरलेले विराट कोहली आणि केएल राहुल यांनी शानदार शतके झळकावत पाकिस्तानविरुद्ध 356 अशा भल्यामोठ्या धावांचा डोंगर उभारला. हा डोंगर पार करण्यात पाकिस्तान संघ अपयशी ठरला. त्यामुळे भारताचा 228 धावांनी विजय झाला. या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम भलताच नाराज झाला. बाबरने संघाची चूकही मान्य केले. चला तर, बाबर आझमची प्रतिक्रिया पाहूयात…
बाबर आझम (Babar Azam) याने भारताविरुद्धच्या पराभवानंतर संघाची चूक मान्य करत म्हटले, गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागात संघाने खराब कामगिरी केली. भारताविरुद्ध मिळालेल्या या पराभवानंतर पाकिस्तानच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या शक्यता कमी झाल्या आहेत.
बाबर आझम याने हवामानाचे कारणही देण्याचा प्रयत्न यावेळी केला. तो म्हणाला, “हवामान आमच्या हातात नव्हते. आमच्या संघाने पूर्ण प्रयत्न केला. मात्र, गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागात आमची कामगिरी खराब राहिली.”
बाबरने भारतीय संघाच्या योजनेचे कौतुकही केले. तो म्हणाला, “भारताच्या सलामीवीरांनी योजनेसह सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शुबमन गिल योजना बनवून फलंदाजी करण्यासाठी आले होते. यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनीही तीच योजना फॉलो केली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या चेंडूला स्विंग मिळत होता. आमची फलंदाजी अपेक्षेनुसार झाली नाही.”
भारतासाठी सोपा मार्ग
भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 356 धावा चोपल्या होत्या. आधी रोहित आणि शुबमन यांच्यात पहिल्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यात नाबाद 233 धावांची मोठी भागीदारी झाली. यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले.
आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ अवघ्या 128 धावांवर सर्वबाद झाला. यावेळी भारताकडून कुलदीप यादव याने 5 विकेट्स घेतल्या. तसेच, भारताने पाकिस्तानविरुद्ध वनडेतील सर्वात मोठा विजयही मिळवला. या पराभवानंतर पाकिस्तानचा नेट रनरेट खूपच खराब झाला आहे. पाकिस्तानची अंतिम सामन्यात पोहोचण्याची शक्यता खूपच कमी आहे. जर श्रीलंकानेही पाकिस्तानला पराभूत केले, तर श्रीलंका अंतिम सामन्यात प्रवेश करण्यात यशस्वी होईल. भारतासाठी अंतिम सामन्यात पोहोचण्याचा मार्ग सोपा झाला आहे. भारताला सुपर- 4 (Super- 4) फेरीत श्रीलंकेव्यतिरिक्त बांगलादेशचा सामना करायचा आहे.
भारताचा पुढील सामना 12 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध कोलंबोच्या आर प्रेमदासा मैदानावरच खेळला जाणार आहे. या सामन्याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. (asia cup 2023 Ind vs Pak pakistan skipper babar azam reaction after heavy defeat against india know here)
हेही वाचा-
पाकिस्तानविरुद्धच्या सर्वात मोठ्या विजयानंतर रोहितचा आनंद गगनाला भिडला; म्हणाला, ‘हे फक्त…’
जडेजाकडून निघाले पाकिस्तानी फलंदाजाचे रक्त, तत्काळ विचारपूर करणाऱ्या राहुलचे सर्वत्र कौतुक