टीम इंडियाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. चौकार-षटकारांचा पाऊस पाडणारा हा खेळाडू जेव्हा मैदानात उतरतो, तेव्हा गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरतो. पण एक संघ असा आहे, ज्याविरुद्ध सूर्यकुमारने अजूनही खास कामगिरी केली नाही, आणि तो म्हणजे पाकिस्तान.
सूर्यकुमारने आत्तापर्यंत पाकिस्तानविरुद्ध 5 टी-20 सामने खेळले आहेत. या पाच सामन्यांमध्ये त्याने फक्त 64 धावा केल्या असून त्याची सरासरी 13 एवढीच आहे. फलंदाजीच्या दृष्टीने ही आकडेवारी त्याच्यासाठी निराशाजनक ठरते. इतर सर्व आंतरराष्ट्रीय संघांविरुद्ध सूर्याने भरपूर धावा केल्या आहेत, पण पाकिस्तानविरुद्ध मात्र तो वारंवार अपयशी ठरला आहे.
आशिया कपबद्दल बोलायचे झाले तर 2022 मध्ये झालेल्या या स्पर्धेत सूर्यकुमारने पाकिस्तानविरुद्ध दोन सामने खेळले. या दोन सामन्यांत त्याने फक्त 31 धावा केल्या होत्या. त्यातील सर्वोच्च खेळी 18 धावांची होती. त्यामुळे या वेळी तो आपल्या बॅटिंगने काहीतरी वेगळं दाखवेल का, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया पुन्हा एकदा विजेतेपदाची दावेदार मानली जात आहे. संघात अनेक अनुभवी आणि तरुण खेळाडू आहेत. पण कर्णधार म्हणून सूर्यकुमारवर विशेष जबाबदारी असेल. त्याला संघाला पुढे नेण्याबरोबरच पाकिस्तानविरुद्ध आपली आकडेवारी सुधारावी लागेल.
14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात गट सामना खेळला जाणार आहे. हा सामना नेहमीप्रमाणेच क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचक ठरेल यात शंका नाही. पण सगळ्यांचे डोळे मात्र भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादववर खिळलेले असतील. त्याने पाकिस्तानविरुद्ध आपल्या बॅटिंग फॉर्ममध्ये सुधारणा केली, तर तो केवळ संघालाच नाही तर स्वतःलाही मोठा आत्मविश्वास देऊ शकेल.






