क्रिकेट विश्वातील सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून भारत आणि पाकिस्तान यांच्याकडे पाहिले जाते. उभय देशांमध्ये सध्या कोणत्याही प्रकारची द्विपक्षीय मालिका होत नाही. हे दोन देश केवळ आयसीसी स्पर्धेमध्ये आमने-सामने येतात. सध्या युएई येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाला पाकिस्तान संघाने २९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विश्वचषकात पराभूत केले. आता या दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका व कसोटी क्रिकेट होण्याची इच्छा व्यक्त केली जात आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये व्हावे क्रिकेट
विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना झाल्यानंतर अनेक आजी-माजी क्रिकेटपटू भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंध पूर्ववत व्हावेत अशी इच्छा व्यक्त करत आहेत. राजकीय तणावामुळे २०१३ पासून दोन्ही देशांमध्ये कोणत्याही प्रकारचे द्विपक्षीय क्रिकेट झाले नाही. तर, या दोन्ही देशांमध्ये २००७ साली अखेरची कसोटी मालिका खेळली गेली होती.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूस याने एका मुलाखतीत बोलताना म्हटले,
“आयसीसीने या बाबतीत हस्तक्षेप करावा. कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांशिवाय जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची कल्पना अपुरी आहे.”
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर उस्मान ख्वाजा यानेदेखील भारत-पाकिस्तान कसोटी मालिका व्हावी अशी इच्छा व्यक्त केलेली. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या आयोजनात तसेच दुसऱ्या आयोजनात भारत-पाकिस्तान यांच्यात कोणतीही कसोटी मालिका होणार नाही.
हे असेल त्रयस्थ ठिकाण
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया हे आदर्श त्रयस्थ ठिकाण होऊ शकते. कारण, या दोन्ही देशांमधील बहुसंख्य लोक ऑस्ट्रेलियात राहतात. २०१५ विश्वचषकावेळी ऍडलेड येथील भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे केवळ १२ मिनिटात विकली गेल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले होते. त्यामुळे येथे क्रिकेटला योग्य वातावरण असून, उभय देशातील सामन्यांसाठी हे एक उत्तम आयोजन स्थळ ठरू शकते. याव्यतिरिक्त, युएईचा देखील त्रयस्थ ठिकाण म्हणून विचार केला जाऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
हिंदी बोलायला नकार दिलेला ईश सोधी जेव्हा पंजाबी मधे करतो कॉमेंट्री, व्हिडिओ व्हायरल