भारतीय संघ लवकरच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी वनडे संघाचा कर्णधार विराट कोहलीला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्टीकरण देखील दिले होते. परंतु, बुधवारी (१५ डिसेंबर) विराट कोहलीने एक मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे सौरव गांगुलीच्या चिंतेत वाढ होऊ शकते.
विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्याच्या ऐवजी रोहित शर्माला ही जबाबदारी देण्यात आली आहे. अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे चाहत्यांसह विराट कोहली देखील आश्चर्यचकित झाला होता.
बुधवारी (१५ डिसेंबर) विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्याने म्हटले की, “मी जेव्हा टी २० संघाचे कर्णधारपद सोडले. तेव्हा मी बीसीसीआय समोर माझी बाजू मांडली होती. मी बीसीसीआयला टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचे कारण देखील सांगितले होते. त्यावेळी त्यांनी माझ्या निर्णयाचे स्वागत करत मला कर्णधारपद सोडण्याची परवानगी दिली होती.”
परंतु, विराट कोहलीला अचानकपणे वनडे संघाच्या कर्णधारपदावरून काढल्यानंतर बीसीसीआयमध्ये राजकारण सुरू आहे, अशा चर्चांना उधाण आले होते. ज्यामुळे सौरव गांगुलीला माध्यमांसमोर येऊन बाजू मांडावी लागली होती. त्यांनी म्हटले होते की, “जेव्हा विराट कोहली टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा विचार करत होता. त्यावेळी आम्ही त्याला असे करून अशी विनंती केली होती. तरीदेखील त्याने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. निवड समितीतील सदस्यांना मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एकच कर्णधार हवा आहे.”
सौरव गांगुली यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर अनेकांना असेही वाटले होते की, विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्यासाठी घाई केली, ज्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला.
याबाबत बोलताना विराट कोहलीने म्हटले की, ” जेव्हा मी टी२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यावेळी मी योग्य कारण देखील दिले होते. जे त्यांना पटले होते. त्यावेळी त्यांना काहीच एक तक्रार नव्हती. त्यावेळी मला कोणीच म्हटलं नव्हतं की तू टी२० कर्णधारपद सोडू नकोस. ८ डिसेंबर रोजी निवड समितीची बैठक होण्याच्या दीड तांसापूर्वी मला संपर्क करण्यात आला आणि सांगण्यात आले की, तू आता वनडे संघाचा कर्णधार नसणार आहे. माझ्या निर्णयानंतर मला काहीच सांगण्यात आले नव्हते.”
महत्वाच्या बातम्या :
“विराट देशापेक्षा मोठा नाही”; दिग्गजाची कर्णधारपदाच्या वादावर तिखट प्रतिक्रिया
आयपीएल मेगा लिलाव: मुंबईचे असणार ‘या’ तीन अनकॅप्ड खेळाडूंवर लक्ष; लावू शकतात कोट्यावधींची बोली
कसोटीतून निवृत्ती स्वीकारण्याच्या वृत्तावर जडेजाने केले चार शब्दांचे ‘अर्थपूर्ण’ ट्विट