भारतीय क्रिकेटचा ऑस्ट्रेलिया दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यादरम्यान भारतीय संघाच्या जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या गोलंदाजांना प्रेक्षकांकडून होणाऱ्या वर्णभेदी टीकेला सामोरे जावे लागले होते. याबाबत भारतीय संघाने अधिकृत तक्रार देखील केली होती. आता याबाबत मोठे अपडेट क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले आहे.
बुधवारी (27 जानेवारी) क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारतीय खेळाडूंविरुद्ध वर्णद्वेषी टीका करण्यात आल्याची पृष्टी केली आहे. मात्र, त्यांना गुन्हेगारांना शोधण्यात अपयश आले आहे. या सामन्यादरम्यान स्टेडियममधून बाहेर काढण्यात आलेल्या 6 प्रेक्षकांची पोलिसांकडून चौकशी झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले आहे. तरी अजूनही या प्रकरणाची चौकशी पुढे चालू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सिडनी कसोटीदरम्यान तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने प्रेक्षकांकडून वर्णद्वेषी टीका होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर चौथ्यादिवशीही तोच प्रकार घडल्याने 10 मिनिटे खेळ थांबला होता. त्यानंतर 6 प्रेक्षकांना स्टेडियममधून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी क्रिकेट ऑस्ट्रेलिया न्यू साऊथ वेल्स पोलिसांच्या मदतीने करत आहेत.
याप्रकरणाबाबत क्रिकेट क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख सीन कॅरोल म्हणाले, ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया पुष्टी करत आहे की भारतीय खेळाडूंविरुद्ध वर्णद्वेषी टीका झाली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलिया या प्रकरणाची चौकशी पुुढेही चालू ठेवत आहे. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, तिकिटिंग डेटा तपासला जाईल. तसेच प्रेक्षकांकडून चौकशी केली जाईल. यातून वर्णद्वेषी टीका करणाऱ्या प्रेक्षकांना शोधण्याचा प्रयत्न करण्यात येईल.’
तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले की कसोटीच्या चौथ्या दिवशी 86 व्या षटकानंतर ब्रेव्हॉन्गल स्टँडमधील फोटो काढण्यात आलेले प्रेक्षक वर्णद्वेषी टीका करण्याच्या प्रकरणात गुंतलेले नाहीत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा रिपोर्ट आयसीसीकडे सुपूर्त केला आहे. यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे की अजून या प्रकरणाबाबत पोलिसांचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही. कारण पोलिस त्यांचे स्वत:चे वेगळी तपासणीही करत आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मागितली होती माफी –
भारतीय संघाने खेळाडूंबद्दल अपमानास्पद टीका होत असल्याची तक्रार केल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवेदन जाहीर केले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवेदनात म्हटले होते की प्रेक्षकांकडून करण्यात आलेल्या अपमानास्पद टीकेला कधीही सहन करण्यात येणार नाही. याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलिया कडक पावले उचलेल. याबरोबरच त्यांनी यजमान म्हणून भारतीय संघाची माफी मागितली होती.
Cricket Australia has reaffirmed its zero-tolerance policy towards discriminatory behaviour in all forms following the alleged racial abuse of members of the Indian cricket squad by a section of the crowd at the SCG yesterday. Full statement ???? pic.twitter.com/34RYcfKj8q
— Cricket Australia (@CricketAus) January 10, 2021
या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाने कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.
महत्त्वाच्या बातम्या –
त्या जबरा फॅनचे मैदानावरुन ‘असे’ आभार मानत इंग्लंडने जिंकली सर्वांची मने, बघा व्हिडिओ
ऑस्ट्रेलियात ‘या’ गोष्टीचा फलंदाजी करताना झाला कायदा, वॉशिंग्टन सुंदरची प्रतिक्रिया
गावसकर यांनी केला खुलासा, भारताच्या मालिका विजयानंतर ब्रायन लारा मला मिठी मारत म्हणाले…






