भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ३ गडी राखून रोमांचक विजय मिळवला आहे. या विजयासह वनडे मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावून भारताच्या विजयाचा नायक ठरलेल्या दीपक चाहरने आपल्या या खेळीचे श्रेय भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याला दिले.
चाहरची अविस्मरणीय खेळी
तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर मंगळवारी (२० जुलै) खेळला गेला. श्रीलंकेने दिलेल्या २७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारताची अवस्था ६ बाद १६० अशी झालेली. त्यानंतर, आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दीपक चाहरने अखेरपर्यंत नाबाद ८२ चेंडूत ७ चौकार व एका षटकाराच्या मदतीने नाबाद ६९ धावा काढत संघाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला.
धोनीला दिले यशाचे श्रेय
आपल्या कारकीर्दीतील पहिल्या अर्धशतकाच्या मदतीने भारताला विजय मिळवून देणाऱ्या चाहरने बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले, “धोनीचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. केवळ आयपीएलमुळे नव्हे तर, लहानपणापासून त्याचा खेळ पाहत आलोय. तो नेहमी सांगत असतो की, आपण मनोरंजन करण्यासाठी आहोत. शेवटपर्यंत हार मानायची नाही व खेळाला अखेरचा चेंडूपर्यंत घेऊन जायचे. सामन्याचा निकाल जास्तीत जास्त आपल्याच बाजूने लागेल. माझा देखील हाच प्रयत्न राहिला.”
दीपक चाहर आयपीएलमध्ये धोनी नेतृत्व करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचे २०१८ पासून प्रतिनिधित्व करत आहे.
????️ ????️: @deepak_chahar9 talks about the impact @msdhoni has had on his on-field mindset. #TeamIndia #SLvIND pic.twitter.com/T5sM5bL1MX
— BCCI (@BCCI) July 22, 2021
दुसऱ्या सामन्यात भारताचा रोमांचक विजय
दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंका संघाने भारतीय संघासमोर २७६ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघातील गोलंदाजांनी भारतीय संघातील मुख्य फलंदाजांना लवकर माघारी धाडले होते. सूर्यकुमार यादव वगळता अन्य भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या रचण्यात अपयश आलेले.
श्रीलंका संघ या सामन्यात एकहाती विजय मिळवणार, असे वाटत असताना दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार यांच्या जोडीने ८४ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला सामना जिंकून दिला. यामध्ये दीपक चाहरच्या ६९ धावांचे योगदान दिले तर, भुवनेश्वर कुमारने १९ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. मालिकेतील अखेरचा सामना २३ जुलै रोजी खेळवण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘ती हो म्हणाली!’ लाईव्ह क्रिकेट सामन्यात प्रियकराने केले प्रपोज; मुलीला आनंदाने अश्रू अनावर
श्रेयस अय्यर करतोय पुनरागमानासाठी जोरदार तयारी, एकाच दिवसात तोडल्यात दोन बॅट, पाहा फोटो
‘ही’ चूक केली नसती, तर आयपीएलमध्ये दीपक चाहरला लागली असती २ कोटींची बोली, वडिलांनी व्यक्त केली खंत