आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. त्यापूर्वी बीसीसीआयने काही नवीन नियम जारी केले आहेत. यामध्ये संघाची प्लेइंग इलेव्हन आणि डीआरएस यासंदर्भातील नियमांचा समावेश आहे. बीसीसीआयने सोमवारी (१४ मार्च) हे नियम जारी केले आहेत.
नवीन नियमानुसार जर संघात एखाद्याला कोरोनाची बाधा झाली, तर संघ त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. जर प्लेइंग इलेव्हन तयार होऊ शकली नाही, तर सामना पुन्हा आयोजित केला जाईल. जर सामना नंतरही खेळवला जाऊ शकला नाही, तर मात्र याचा निर्णय तांत्रिक समितीकडे सोपवला जाईल. तसेच आगामी आयपीएल हंगामात (IPL 2022) प्रत्येक सामन्यातील प्रत्येक डावात संघाला दोन डीआरएस (DRS) मिळतील.
क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, “बोर्ड त्यांच्या पद्धतीने सामना पुन्हा आयोजित करण्याचा प्रयत्न करेल. जर असे होऊ शकले नाही, तर हा मुद्दा आयपीएलच्या तांत्रिक समितीकडे पाठवला जाईल. तांत्रिक समितीचा निर्णय अंतिम असेल, जो सर्वांना मान्य करावा लागेल. हे जुन्या नियमांप्रमाणेच आहे, यामध्ये फक्त एक बदल केला जाईल. जुन्या नियमांमध्ये म्हटले गेले होते, बोर्ड नंतर सामना आयोजित करण्याचा प्रयत्न करणार आहे. जर हे शक्य नसेल तर त्यामुळे प्रभावित झालेल्या संघाला पराभूत समजले जाईल आणि त्याच्या विरोधी संघाला दोन गुण दिले जातील.”
आयपीएल २०२२ मध्ये सर्वात महत्वाचा बदल डीआरएस संदर्भात होणार आहे. नवीन नियमाप्रमाणे बीसीसीआयने प्रत्येक सामन्यच्या प्रत्येक डावातील डीआरएसची संख्या दोन केली आहे. यापूर्वी प्रत्येक डावात फक्त एक डीआरएस संघ घेऊ शकत होता.
काही दिवसांपूर्वी मॅरीलेबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमांमध्ये सुधारणा केली होती. बीसीसीआयने या बदलांना समर्थन दिले, ज्यामध्ये सांगितले गेले आहे की, नवीन फलंदाजाला स्ट्राइकवर यावे लागेल. म्हणजेच झेलबाद होणाऱ्या फलंदाजाने जरी क्रिज सोडले असले, तरी नव्या खेळाडूलाच पुढचा चेंडू खेळावा लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी मैदानावर धावलेल्या फॅन्सबाबत मोठी अपडेट, पोलिसांनी केलीये कडक कारवाई