अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवारपासून(२४ फेब्रुवारी) कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरु झाला. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना आहे. त्यामुळे या सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर होत आहे. त्यामुळे इंग्लंड संघाच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे.
हा सामना भारतात होत असल्याने गुलाबी चेंडू हा एसजी (सन्सपेरिल्स ग्रीनलँड्स) कंपनीचा आहे. भारतात खेळवण्यात येणाऱ्या जवळपास सर्व सामन्यात एसजी कंपनीचे चेंडू वापरले जातात. त्यामुळे तीन वेगवेगळ्या कंपनीच्या गुलाबी चेंडूने दिवस-रात्र कसोटी सामना खेळणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला आहे. इंग्लंडने कुकाबुरा, ड्यूक आणि एसजी या कंपनीच्या गुलाबी चेंडूने दिवस-रात्र कसोटी सामना खेळला आहे.
वेगवेगळ्या देशात वापरले जातात वेगवेगळे चेंडू
एसजी कंपनीचे चेंडू हे भारतात वापरले जातात. तसेच कुकाबुरा कंपनीचे चेंडू ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड देशांमध्ये वापरले जातात. तसेच ड्यूक चेंडू इंग्लंडमध्ये वापरले जातात. त्यामुळे क्रिकेटपटूंना वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या कंपनीच्या चेंडूंनी क्रिकेट खेळावे लागते.
इंग्लंडने वापरलेले ३ वेगवेगळे गुलाबी चेंडू
इंग्लंडचा हा चौथा दिवस-रात्र कसोटी सामना आहे. याआधी इंग्लंडने इंग्लंडमध्ये, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये दिवस-रात्र कसोटी सामना खेळला आहे. इंग्लंडने एजबस्टन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध २०१७ साली ड्यूक कंपनीच्या गुलाबी चेंडूने दिवस-रात्र कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेड येथे तर न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंड येथे कुकाबुरा कंपनीच्या गुलाबी चेंडूने दिवस-रात्र कसोटी सामना खेळला होता. आता इंग्लंडचा संघ भारतात अहमदाबाद येथे एसजी कंपनीच्या गुलाबी चेंडूने दिवस-रात्र सामना खेळत आहे.
पहिल्या दिवशी भारताचा दबदबा
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकला. त्यामुळे इंग्लंडचा कर्णधार जो रुटने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय भारतीय गोलंदजांनी चुकीचा ठरवत इंग्लंडचा पहिला डाव ४८.४ षटकांत ११२ धावांत संपवला. इंग्लंडकडून या डावात जॅक क्रॉलीने सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली. अन्य फलंदाजांना २० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. तर आर अश्विनने ३ विकेट्स आणि इशांत शर्माने १ विकेट घेतली.
त्यानंतर भारताकडून पहिल्या डावात रोहित शर्मा पहिल्या दिवसाखेर ५७ धावांवर नाबाद आहे. त्याच्याबरोबर अजिंक्य रहाणे १ धावांवर नाबाद आहे. भारताने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात ३३ षटकात ३ बाद ९९ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
-क्रिकेटमध्ये वापरले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू
व्हिडिओ : विवादित झेलामुळे स्टोक्स होतोय ट्रोल, चाहत्यांनी केली पॉंटिंगशी तुलना
ईशांत शर्माने उलगडली धोनीसह खेळलेल्या ‘त्या’ सामन्याची आठवण, भावूक होत म्हणाला…
“आर अश्विन एक विश्वस्तरीय खेळाडू!” पाहा कोणी उधळली भारताच्या गोलंदाजावर स्तुतिसुमने